औरंगाबाद ः हातावर घड्याळ, हातात धनुष्यबाण हा विचार जो महाराष्ट्राने स्वीकारलायं, त्या विचारावर शिक्कामोर्तब करणाही ही मराठवाडा पदवीधरची निवडणूक आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी बारा वर्षात केलेल्या कामामुळे आता निवडणुकीची फक्त औपचारिकता शिल्लक राहीली आहे, ते तिसऱ्यांदा हॅट्रीक साधतील आणि या विजयात लातूरचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिला.
मराठवाडा पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ लातूरच्या दयानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात अमित देशमुख बोलत होते. व्यासपीठावर जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदींची उपस्थिती होती.
अमित देशमुख म्हणाले, भाजपचे नेते दोन महिन्यात सरकार पडणार असे भाषणातून सांगत असल्याचा उल्लेख अब्दुल सत्तार यांनी केला. पण त्यांचे हे दोन महिने गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू आहे. व्यासपीठावर जयंत पाटील मधोमध बसलेले आहे, त्यांच्या एका बाजुला मी तर दुसऱ्या बाजुला अब्दुल सत्तार बसलेले आहेत. जयंत पाटलांनी आमच्या दोघांचेही हात घट्ट पकडून ठवले आहेत, मग हे सरकार कसे पडेल? असा सवाल अमित देशमुख यांनी उपस्थित केला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात फक्त महाविकास आघाडीचीच चर्चा आहे, त्यामुळे सतीश चव्हाण हे निश्चित हॅट्रीक साधणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही. वर्षभरापुर्वी महाराष्ट्रात शरद पवार यांच्या संकल्पनेतून आकारास आलेले महाविकास आघाडीचे सरकार याचे स्वागत संपुर्ण देशाने केले. हा जो नवा विचार महाराष्ट्राने स्वीकारला आहे, त्यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक असल्याने ती आपल्याला जिकांवीच लागेल.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार वेगाने पुढे जात आहे. वैद्यकीय शिक्षण आणि पदवीचे शिक्षण या क्षेत्रात आपण मोठे काम करत आहोत. जिल्हा तिथे विद्यापीठ ही संकल्पना स्वीकारली तर लवकरच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विद्यापीठाची स्थापना करून शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर केला जाऊ शकतो. त्याच प्रमाणे वैद्यकीय शिक्षण आणि सेवा सर्वस्तरापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही नव्या वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांना मंजुरी देत असल्याचेही अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
कोरोनात मुख्यमंत्र्यांनी केलेले काम कौतुकास्पद..
अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी जे काम केले त्याची दखल अमेरिक, लंडन, जपान सारख्या देशांनी घेतली. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान वाढवण्याचे काम त्यांनी केले. कधी दुजाभवा केला नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा कोरोनाची लागण झाली तेव्हा त्यांच्यावर देखील महाविकास आघाडी सरकारच्या देखरेखी खाली उपचार झाले. ते लवकर कसे बरे होतील याकडे देखील आम्ही लक्ष दिल्याचे अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.