पुणे : पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'स्वतंत्र पदवीधर विकास महामंडळ' स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्याबरोबरच विना अनुदानीत शाळा महाविद्यालयातील शिक्षक-प्राध्यापक तसेच स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत काटेकोर राहण्यासाठी पाठपुरावा करण्याचा वचननामा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार प्रा. सचिन ढवळे यांनी आज जाहीर केला.
हिंगोली येथे पत्रकार परिषदेत प्रहारचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष अॅड. विजय राऊत, युवक जिल्हाध्यक्ष रॉबर्ट बांगर, बेरोजगारांचे नेते चांगदेव गिते यावेळी उपस्थित होते. अंशकालीन निदेशक अर्थात (कला , क्रीडा , कार्यानुभव ) शिक्षक यांना कोणत्याही पटसंख्येची अट न ठेवता नियुक्ती देवून कायम करण्याबाबत धोरण राबविणार, विनाअनुदानित, अनुदानित व खाजगी शाळा महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार, कोचिंग क्लासेस लवकरात लवकर सुरु करून संचालकांना कोरोना काळात शिकवणी वर्ग बंद असल्या कारणाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी योग्य ते धोरण तयार करण्यासाठी प्रयत्न करणार, केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) प्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) पूर्व नियोजित वेळापत्रक निश्चित करून निकाल ४५ दिवसांत जाहीर करण्यास प्रयत्न करणार तसेच लवकरात लवकर रिक्त पदे भरावीत यासाठी प्रयत्नशील राहणार. राज्यात सध्या पदवीधर निवडणुकीचे धमासान चालू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू असताना आता प्रत्येकाने आपाला जाहिरनामा प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
वचननाम्यातील काही महत्वाचे मुद्दे
- सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मोर्चामध्ये सहभाग घेतला तसेच आरक्षण मिळवून देण्यासाठी मिळालेल्या जबाबदारीवर नेहमी कार्यतत्पर असेल, सारथी, बार्टी, महाज्योती या संस्थांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पाठपुरावा करणार,
- जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी विधिमंडळात पाठपुरावा करणार, पदवीधरांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करून व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार,
- पदवीधरांना व्यावसायिक शिक्षण तसेच परदेशातील शिक्षण घेण्यासाठी अल्प दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी शासन स्तरावर धोरण व्हावे यासाठी प्रयत्न करणार,
- तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे रखडलेले मानधन तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारअन्यायकारक तासिका (सीएचबी) पद्धत बंद करून कायमस्वरूपी प्राध्यापक भरतीसाठी पाठपुरावा करणार, पदवीधर शिक्षकांना (६ ते ८) सरसकट ग्रेड पे देण्यासाठी प्रयत्न करणार, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार
- कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील गेल्या १२ वर्षापासुन कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी कायम करण्यासंदर्भात प्रयत्न करणार, मुख्यमंत्री यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कोरोणा कार्य करणाऱ्या कोरोना योद्धा स्वयंसेवकाला मानधन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार,
- साक्षर भारत प्रेरक यांना मानधन देणे आणि शासन सेवेकरिता प्राधान्यक्रम देण्यासाठी प्रयत्न करणार, जिल्हानिहाय विद्यापीठ उपकेंद्र सुरु करण्यासाठी विधिमंडळात पाठपुरावा करणार, पदवी प्राप्तीनंतर पदवीधरांना लवकर नोकरी मिळावी, म्हणून सर्व विद्यापीठामध्ये 'स्वतंत्र प्लेसमेंट सेल ' उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार,
- कौशल्यावर आधारित आणि व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष भर देणार, ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे उपलब्ध करून देणार, तालुकानिहाय केजी टू पीजी सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार,
- बेरोजगार पदवीधरांना वर्षातील किमान १०० दिवसांचा त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्यानुसार रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, संगणक (आयसीटी ) शिक्षक यांची पदे निर्माण करून नियुक्ती देण्यासाठी प्रयत्न करणार, परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी नवीन विद्यापीठ कायद्यात योग्य त्या सुधारणा व्हाव्यात म्हणून प्रयत्न करणार,
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल व इतर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रिया बाबत विशेष कक्ष स्थापन व्हावा यासाठी प्रयत्न करणार, शासन स्तरावर जिल्हानिहाय सर्व सोयीनीयुक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरु करण्यासाठी भर देणार, पदवीधर नवउद्योजकांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक ती माहिती मिळावी यासाठी विशेष तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून देणार.