Mahadevrao Mahadik-Satej Patil
Mahadevrao Mahadik-Satej Patil Sarkarnama
विशेष

महाडिक गटाला धक्का; सतेज पाटील गटाची सरशी : राजाराम कारखान्याचे १३२६ सभासद अपात्र

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांच्या गटाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कसबा बावडा येथील राजाराम सहकारी साखर कारखान्यातील कार्यक्षेत्राच्या बाहेरील आणि बनावट असा १३४६ सभासदांना अपात्र ठरविण्याचा सहकारी मंत्री आणि प्रादेशिक साखर सहसंचालक यांचा निर्णय मुंबई उच्च न्यायलयानेही कायम ठेवला आहे. बनावट सभासदांच्या न्यायालयीन लढाईतही माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) गटाची सरशी झाली आहे, त्यामुळे राजाराम कारखान्याची निवडणूक घेण्यातही अडथळेही आता दूर झाले आहेत. (1326 members of Rajaram Sugar factory disqualified; High Court decision)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजाराम काखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. त्यातील सुमारे १८९९ सभासदांच्या विरोधात शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने हरकत घेण्यात आली होती. त्या हरकतीवर प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे सुनावणी झाली. त्या सुनावणीत १८९९ पैकी ४८४ सभासद पात्र ठरले होते. मात्र सहसंचालकांनी १४ फेब्रुवारी २०२० रोजी दुबार, बनावट आणि कार्यक्षेत्राबाहेरील असे एकूण १३४६ सभासद अपात्र ठरविले होते.

सत्तारुढ महाडिक गटाने त्या निर्णयाच्या विरोधात तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे अपिल केले होते. सहकार मंत्र्यांनी ते अपिलही फेटाळले होते. त्यानंतर मात्र महाडिक गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल दोन वर्षांनंतर महाडिक गटाच्या याचिकेवर उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्यासमोर गुरुवारी (ता. २२ सप्टेंबर) सुनावणी झाली. त्या सुनावणीत सहकार मंत्री आणि साखर सहसंचालकांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. तर महादेवराव महाडिक गटाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. सतेज पाटील गटाला या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. मात्र, सत्ताधारी महाडिक गट बॅकफूटवर गेल्याचे मानले जात आहे.

माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची राजाराम कारखान्यावर तब्बल २८ वर्षांपासून सत्ता आहे. गोकुळ पाठोपाठ महाडिकांच्या या सत्तेला माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडून आव्हान देण्यात येत आहे. काखान्याच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील गटाचा पॅनेल निसटता पराभव झाला होता. त्याचे उट्टे काढण्याची तयारी पाटील गटाकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्यात बदलेल्या सत्तेचा कारखान्याचा निवडणुकीत कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होतो, हे पाहावे लाणार आहे.

कायदेशीर बाबी पडताळून पाहू : महाडिक

दरम्यान, या निकालासंदर्भात बोलताना सत्ताधारी महाडिक गटाचे नेते माजी आमदार अमल महाडिक म्हणाले की, न्यायव्यवस्थेचा संपूर्ण सन्मान राखून सर्व कायदेशीर बाबी पडताळून पाहण्यात येतील. त्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यात येईल.

सभासदांना न्याय मिळाला : पाटील

माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले की, राजाराम कारखाना हा सभासदांचाच राहिला पाहिजे, त्यासाठी आमची लढाई सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सभासदांना न्याय मिळाला आहे. कारखान्या स्थानिक सभासदांनी बाहेरच्या जिल्ह्यांतील सभासदांविरोधात हा लढा उभारला होता, त्याला यशही मिळाले आहे.

गावनिहाय अपात्र सभासद पुढीलप्रमाणे : शिरोली-४०२, वडगाव-११९, लाटवडे-३९, टोप-७८, संभापूर-१३, हेरले-३२, आळते-७, भेंडवडे-६२, लाटवडे-३९, भादोले-३३८, पेठवडगाव-१६९, तासगाव-२९, साखरी-५८.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT