Vidhansabha Election 2024 Sarkarnama
विशेष

21 September in History : दहा वर्षांपूर्वीही युती-आघाडीचं घोडं अडलं होतं जागावाटपावरच; आजही तीच स्थिती

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा वर्षांत प्रचंड उलथापालथ झाली आहे. आजपासून दहा वर्षांपूर्वीही राज्यात याच वेळी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले होते. त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, यात काय साम्य आहे?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपचा विधानसभा निवडणुकीपूर्वी आत्मविश्वास उंचावला होता. राज्यातही भाजप-शिवसेना युतीला सत्ता खुणावत होती. याचवेळी दहा वर्षांची सत्ता गमावल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली होती. पण विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चांवरून युती व आघाडीमध्ये गणित काही जमत नव्हते.

आजपासून दहा वर्षांपूर्वीही हीच धुसफूस हा राज्यातील चर्चेचा विषय होता. माहीत आहे त्या दिवशी 'सकाळ'मधील मुख्य बातमी काय होती?

Political Party

आजचे दिनविशेष-

१७४३ : तत्कालीन जयपूर संस्थानचे कर्तबगार व विद्याप्रेमी राजे सवाई जयसिंह यांचे निधन. त्यांनी प्रजेच्या सुखासाठी धर्मशाळा, रस्ते, विहिरी बांधल्या. बादशहाकडून त्यांनी जिझिया कर रद्द करविला. १७२८ मध्ये जयपूर ही राजधानी म्हणून त्या शहराची नवीन रचना केली.

१८४९ : ब्रिटिश साहित्यिक एडमंड गॉस यांचा जन्म. इंग्रजीबरोबरच स्कॅंडिनेव्हियन भाषांतील साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता. त्यांनी इब्सेन यांची नाटके अनुवादित करून इंग्लंडमध्ये लोकप्रिय केली. त्यांनी "फादर अँड सन' हे आत्मचरित्र लिहिले.

१९३१ : सुफी विचाराच्या सद्‌गुरू हजरत बाबाजान यांचे निधन. पुण्यात लष्करातील चारबावडी परिसरात बाबाजानचा दर्गा आहे.

१९५० : इंग्रज खगोलशास्त्रज्ञ, गणिती व विश्‍वोत्पत्तिशास्त्रज्ञ एडवर्ड आर्थर मिलन यांचे निधन. त्यांचे बरेचसे संशोधन युद्धासंबंधीच्या विषयात असले तरी खगोलभौतिकी व विश्‍वोत्पत्ती या विषयातील त्यांच्या कामामुळे ते प्रसिद्धीस आले.

१९९४ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व ख्यातनाम उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचे निधन. बच्छराज अँड कंपनी, हिंदुस्थान शुगर मिल्स, मॅचवेल इलेक्‍ट्रिकल्स (इंडिया), हर्क्‍युलस हॉइस्ट्‌स वगैरे कंपन्यांचे त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यांनी "जपान की सैर', "रुसी युवकों के बीच', "अटलांटिक के उसपार', "द यंग रशिया' व "सोशल रोल ऑफ बिझिनेस' ही पुस्तके लिहिली.

१९९५ : पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे प्रभारी संचालक डॉ. पॉल रत्नासामी यांना इटली येथील "थर्ड वर्ल्ड नेटवर्क ऑफ सायंटिफिक ऑर्गनायझेशन'चा तंत्रज्ञानविषयक पुरस्कार जाहीर.

२००१ : जहाजावरून जहाजावर मारा करू शकणाऱ्या "धनुष्य' या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.

२००३ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि रामजन्मभूमी आंदोलनाचे मार्गदर्शक मोरोपंत मोरेश्‍वर पिंगळे यांचे निधन.

२००४ : धर्माच्या नावाने बोकाळणाऱ्या अधर्माशी "जिहाद' करण्याची जिद्द ज्यांच्यात आहे आणि त्यासाठी आवश्‍यक ती किंमत मोजायलाही तयार असणारे ज्येष्ठ विचारवंत असगर अली इंजिनिअर आणि कृतिशील सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांना "प्रतिनोबेल' गणला जाणारा "राईट लाईव्हलिहूड' पुरस्कार जाहीर. असगर अलींनी भारतातील मुस्लिम आणि जातीय हिंसेविषयी अतिशय अभ्यासपूर्ण असे ४७ ग्रंथ लिहिले आहेत. वैदिक धर्माची संकल्पना, कार्ल मार्क्‍सची मीमांसा आणि गांधीजींची जीवनपद्धती, यांचा सुरेख मेळ घालण्याचा प्रयत्न स्वामी अग्निवेश करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT