Eknath Shinde-Ujjwal Nikam
Eknath Shinde-Ujjwal Nikam Sarkarnama
विशेष

राज्यपालांच्या ‘त्या’ निर्णयाचा धोका सांगून उज्वल निकमांनी एकनाथ शिंदेंना दिला हा सल्ला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील सत्तांतरावरून सर्वोच्च न्यायलयात (Supreme Court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात घमासान सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्याशी या सर्व न्यायालयीन लढाईसंदर्भात चर्चा केल्याचे पुढे आले आहे. या चर्चेवेळी निकम यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार हा न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर करण्याचा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांना दिला. तसेच, विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी बोलावलेले अधिवेशन अडचणीचे ठरू शकते, अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले. (Adv. Ujjwal Nikam gave this advice to Chief Minister Eknath Shinde)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठी शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. तसेच पक्षचिन्ह, राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशन यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात कुठेही कमतरता राहू नये, यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून कायद्याचा किस पाडला जात आहे. ज्येष्ठ वकिलांशी चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोन दिवसांपूर्वी याच न्यायालयीन लढाईसंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली आहे.

या चर्चेवेळी ॲड. निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात सल्ला दिला आहे. न्यायालयीन प्रक्रिया झाल्यावरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, असे निकम यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड प्रकियेसाठी राज्यपालांनी बोलावले अधिवेशन न्यायालयात अडचणीचे ठरू शकते, असा धोकाही निकम यांनी एकनाथ शिंदे यांना या चर्चेवेळी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी शिंदे गटाच्या वकिलांना कोंडीत पकडणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे शिंदे गटाबरोबरच भाजपमध्येही अस्वस्थता वाढल्याचे सांगितले जात आहे. उद्या उठसूट कोणताही पक्ष अथवा आमदार म्हणतील की आम्ही वेगळे गेलो अणि दोन तृतीयांश आहेत, म्हणजेच आम्हीच पक्ष आहोत. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी सुनावणीदरम्यान बोलून दाखवल्याचे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT