Ajay Choudhari-Bhaskar Jadhav
Ajay Choudhari-Bhaskar Jadhav sarkarnama
विशेष

ठाकरेंची निवड चुकली? : अजय चौधरींचा प्रभाव पडेना! भास्कररावांना संधी मिळेना!!

ज्ञानेश सावंत

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांनी विधानसभेतील गटनेतेपदाची जबाबदारी अजय चौधरींकडे (Ajay Choudhari) यांच्याकडे सोपवली खरी पण त्यांचा विशेष प्रभाव पडताना दिसत नाही. विशेष अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनातही गटनेता म्हणून चौधरी हे सभागृहातच काय तर सभागृहाबाहेरही शिवसेनेची आपली छाप पाडण्यात कमी पडत आहेत त्यामुळे बंडानंतर उरलीसुरली शिवसेना सभागृहात नावापुरतीच वाटू लागली आहे.

दुसरीकडे, सगळा पक्ष फुटूनही डावलले गेलेले आमदार भास्कर जाधव यांचाच आवाज सभागृहात घुमत असल्याचे आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या तासातच दिसून आले. विरोधकच नाही तर जाधवांपुढेही गटनेते असलेले चौधरी 'डावे' ठरत आहेत. त्यामुळे तब्बल ३० वर्षांचा अनुभव, अभ्यास आणि मूळ शिवसैनिकांप्रमाणे आक्रमक शैली असल्याने समर्थपणे सभागृह सांभाळण्याची क्षमता असलेल्या जाधवांऐवजी ठाकरेंनी चौधरींकडेच हे पद का सोपवले असावे, याचीही चर्चा नव्याने सुरू आहे.

सत्ता आणि राजकीय अस्तित्त्वाच्या ईर्ष्येने पेटलेल्या शिवसेना अणि बंडखोरांत रोज धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. सत्ता हिसकावल्यानंतर थेट पक्षाच्या चिन्हावर ताब्याची तयारी शिंदे गटाने केली आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्षात भरच पडणार आहे. त्यात सभागृहातही सरस ठरण्याची शिंदे गटाची रणनीती आहे. शिंदेंची कोंडी करण्याची ठाकरेंचा मनसुबा असला तरी सभागृहातील लढाईत मात्र ठाकरेंनी पुढे केलेले चौधरी फिके असल्याचे बुधवारी पुन्हा दिसून आले.

त्यातुलनेत संधी मिळताच भाजपला अंगावर घेणारे जाधव शिवसेनेसाठी उजवे वाटून लागले आहेत. याआधी विश्वासदर्शक ठरावादरम्यानही जाधवांनीच शिंदे गट आणि भाजपला धुतले होते. पावसाळी अधिवेशनाही जाधवांनी शिंदे गट आणि भाजला चांगले सुनावले. तेव्हा चौधरी हे कुठेच दिसले नाहीत. सभागृहाचे कामकाज तहकूब होताच जाधव यांनी माध्यमांपुढे येऊन बंडखोरांना धडा मिळणार असल्याचे सांगितले. त्यावेळी चौधरी हे माध्यमांच्या काही प्रतिनिधींना टाळून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेकडे निघाले.

ऐन पडझडीतही चौधरी वेळ काढूपणाच करीत असल्याने शिवसेनेला सभागृहाही 'बॅकफूट' वरच राहावे लागण्याची चिन्हे आहेत. जाधव हे सहावेळा आमदार राहिले असून, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे सभागृहातील कामकाजातील बारकावे त्यांना चांगले ठाऊक आहेत. ठाकरे सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात तालिकाध्यक्ष असताना जाधवांनी भाजपच्या १२ आमदारांनी निलंबित केल्याने ते राज्याच्या राजकारणात चर्चेत आले होते. पर्यायाने शिवसेनेतही त्यांचे वजन वाढले होते. मात्र, सरकारमध्ये मंत्रीपदापासून संघटनेतही त्यांना बाजूला ठेवले जात आहे. सध्याच्या काळातही त्यांना ठाकरे हे फारसे जवळ करीत नसल्याचे खंत ते बोलून दाखवतात. त्यातून जाधवांसारख्या तगड्या नेत्याला डावलून चौधरीसारख्या कमी अनुभवाच्या नेत्याला गटनेतेपदावर बसविल्याने ऐन संकटात शिवसेनेची फजिती होण्याची वेळ आली आहे.

चौधरी २०१४ आणि आता २०१९ च्या निवडणुकीत शिवडीतून आमदार झाले असून, याआधी त्यांच्याकडे पक्षाच्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी होती. आजघडीला त्यांच्याकडे जेमतेम साडेसात-आठ वर्षाचाच अनुभव आहे. त्यातही सभागृहाच्या कामातही त्यांनी कधी लक्ष्य घातले नव्हते तरीही त्यांच्याकडे प्रमुख पद आले; मात्र चमकदार कामगिरीची अपेक्षा तूर्त फोल ठरत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT