Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis
Ajit Pawar-Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

AjitDada on Shinde-Fadnavis : शिंदे-फडणवीसांना ‘त्या’ गोष्टीची भीती, त्यामुळेच ते निवडणुका पुढे ढकलत आहेत : अजितदादांनी उघड केला डाव

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : लोकशाहीचे व जनमताचे संकेत डावलून भाजप (BJP) व एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गट एकत्र आल्याने आगामी निवडणुकांत जनमताच्या कौलाबाबत त्यांना धास्ती आहे. निवडणुकीला सामोरे जाताना लोकांची नाराजी ओढवेल की मदत होईल, हेच सत्ताधारी वर्ग चाचपत असल्याने निवडणुकांना विलंब होत आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. (Ajit Pawar told Reason to postpone ZP, Municipal elections)

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील कार्यक्रमात अजितदादांनी राज्य सरकारच्या कामकाजावर, धीम्या पद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे स्वतः पदावर बसलेत. पण, बाकीच्या निवडणुका घेत नाहीत. महानगरपालिका व अनेक नगरपालिकांवर वर्ष होत आले तरी प्रशासकच आहेत. फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका व्हायला पाहिजे होत्या. पण अजून कशाचाच पत्ता नाही.

ओबीसींच्या आरक्षणासाठी महाविकास आघाडीने निवडणुका घेतल्या नव्हत्या. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असतानाही निवडणूका घेतल्या जात नाहीत. प्रथम अतिवृष्टीच्या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलल्या. आता पावसाळा संपून कडाक्याची थंडी पडली तरी निवडणुकांचा पत्ता नाही. सत्ताधारी चाचपत आहेत. शिंदे गट आणि भाजप मिळून निवडणुकीला सामोरे गेले तर लोकांची नाराजी पाहायला मिळेल की, आपल्याला मदत होईल. याचा शोध ते घेत आहेत. पण त्यांना अजूनही लोकांचा अंदाज येईना. कारण जे सत्तेसाठी भाजपकडे गेले ते शिवसैनिकांना विचारून नाही गेले. सूरत, गुवाहाटीला काही कुठले तरी टॉनिक मिळाले असेल म्हणून गेले. जनता हुशार आहे. ते ना माझे ऐकतील ना त्यांचे ऐकतील. वेळ येताच ते बरोबर बटण दाबतील. ज्याला सत्तेवर बसवायचे त्याला बसवतील आणि ज्याला घरी पाठवायचे त्याला घरचा रस्ता दाखवतील, असे अजित पवार म्हणाले.

राणे-भुजबळ पडले; शिंदेंनाही महागात पडणार

शिवसेनेतून नारायण राणे आणि छगन भुजबळ बाहेर पडले. त्यावेळी लोकांनी त्यांना नाकारले. पवारसाहेबांनाही काहीजण सोडून गेले. पण जनतेने त्यांना हिसका दाखवला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरीही त्यांना महागात पडेल, असा इशारा अजितदादांनी दिला.

मुख्यमंत्री टाळाटाळ करतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात एकत्र काम पाहात होतो, तेव्हा ते अतिशय धीरोदात्तपणे कारभार करायचे. सल्लामसलत व्हायची. पण, भारतीय जनता पक्षाकडे गेल्यापासून त्यांचे काम बिघडलंय. कुठलाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसल्याने ते केवळ बघू, करू म्हणत वेळ मारून नेत आहेत. काम घेऊन गेलो की या उद्या, या परवा म्हणून टाळाटाळ करीत आहेत, असा आरोपही अजित पवार यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT