Enforcement Directorate
Enforcement Directorate  
विशेष

Enforcement Directorate : तुम्हालाही ईडीची भीती वाटते का? मग हे वाचाच

अनुराधा धावडे

Enforcement Directorate : महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणांच्या धाडी पडत आहेत. यात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने सर्वाधिक कारवाया केल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. पण ईडी (ED) म्हणजे काय, ईडी नेमके काय काम करते, ईडीचे अधिकारी कोण असतात, त्यांची नेमणूक कशी होते आणि ईडीची कारवाई केव्हा होते. हे माहिती असणेही महत्त्वाचे आहेच.

- ईडी म्हणजे काय ?

१९५६ मध्ये राजधानी दिल्लीत ईडी'ची स्थापना झाली. तेव्हापासून देशातील पैशांचा गैरव्यवहार किंवा आर्थिक घोटाळ्यांचा तपास करणे हे ईडीचं मुख्य काम आहे. केंद्र सरकारच्या महसूल विभाग आणि अर्थ मंत्रालया अंतर्गत ईडी (Enforcement Directorate) चे काम करते असते.

- कोणत्या कायद्यांतर्गत ईडीची स्थापना झाली ?

१. परकीय चलन व्यवस्थापन कायदा,१९९९ (Foreign Exchange Management Act, 1999) (FEMA) 

२. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा, २००२. (Prevention of Money Laundering Act,2002) (PMLA) 

जर कोणतीही संस्था किंवा व्यक्तीकडून या कायद्यांचे उल्लंघन झाले असेल तर, ईडीद्वारे तपास केला जातो. पैशांच्या गैरव्यवहाराचा तपास करणे, अटक करणे, खटला दाखल करणे, मालमत्ता जप्त करणे, असे अनेक अधिकार या कायद्यांतर्गत ईडीला देण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी संबंधिताची बेहिशेबी मालमत्ता, कर चुकवेगिरी आणि आर्थिक घोटाळ्यांचा तापस ईडीद्वारे केला जातो.

- ईडी'चे मुख्य कार्यालय कुठे आहे?

नवी दिल्लीत ईडी'चे मुख्य कार्यालय आहे. याशिवाय संपूर्ण देशभरात ईडीची विभागीय / उपविभागीय कार्यालयेही आहेत. तसेच मुंबई, चेन्नई, कलकत्ता, चंदीगड, दिल्ली याठिकाणी विशेष संचालकाद्वारे ईडीचे काम चालते. तसेच, देशभरात ईडीची जवळपास ४९ कार्यालये आहेत.

- अशी होते ईडीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक?

सुरुवातीला रिझर्व्ह बँकेमार्फत ईडीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जायची. पण ईडी महसूल विभाग अंतर्गत आल्यापासून सीमाशुल्क विभाग (Custome), प्राप्तिकर विभाग (Income Tax Department), पोलीस (POlice),केंद्रीय उत्पादन शुल्क (Central Excise) या संस्थांमधून अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते. या अधिकाऱ्यांवर कोणत्याही दबावाचा परिणाम होत नाही.

- ईडीची भिती कोणाला?

ईडीने आतापर्यंत देशभरात अनेक मोठमोठ्या उद्योगपतींचे आर्थिक घोटाळे बाहेर काढले आहे. मोठे आर्थिक घोटाळे, पैशांचे गैरव्यवहार, बेहिशोबी मालमत्ता, कर चुकवणे अशा अनेक प्रकरणांवर ईडीने मोठ्या कारवाया केल्या आहेत. पण ईडीच्या भितीने अनेक उद्योगपतींनी अटक होण्यााआधीच देशातून पळ काढला आहे. नीरव मोदी आणि विजय मल्ल्या ही यातलीच उदाहरणे

दरम्यान, अलीकडे अनेक विरोधीपक्षनेत्यांवर ईडीच्या कारवाया केल्या जात आहेत. सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून ईडी कारवाया करत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. पण ईडी ही स्वायत्त संस्था असून तिला कायद्याद्वारे विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून नाही तर पुराव्यांच्या आधारे तक्रार केल्यानंतर ईडी आपला तपास सुरु करते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT