Nagpur News:स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहून राजू शेट्टींशीच वैर घेतलेल्या,बुलढाण्यातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवलेल्या रविकांत तुपकर यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.यानंतर रविकांत तुपकर आणि शेट्टी यांच्यातील वाद टोकाला गेला होता. एकेकाळी स्वाभिमानी संघटना वाढवण्यात आणि आक्रमक आंदोलनात तुपकरांचं नाव सर्वात पुढं होतं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली,पण आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी स्वाभिमानीच्या गुरु-शिष्यांना शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र आणलं आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महाएल्गार पुकारला आहे.त्यामुळे नागपूर शहरात अभूतपूर्व कोंडी झाली आहे. जोपर्यंत कर्जमाफीचा आदेश काढला जात नाही,तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असा निर्धार करत त्यांनी शेतकरी नेत्यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. या आंदोलनात बच्चू कडू यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी,रासपचे महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले,एकेकाळी शेट्टी यांचे कट्टर समर्थक राहिलेले रविकांत तुपकर यांच्यासह अनेक नेतेमंडळींचा यात समावेश आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारला आंदोलनं, मोर्चे यांच्या माध्यमातून घाम फोडला होता.तुपकर यांनी पुढे शेट्टींवरच गंभीर आरोप केले होते. राज्यभरात स्वाभिमानीच्या माध्यमातून आपले वेगळे वलय आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज निर्माण करणाऱ्या तुपकर यांनी बुलढाणा मतदारसंघातून अपक्ष निवडणूकही लढवली होती.त्यांनी निवडणुकीत लाखभर मतं मिळवली होती.
रविकांत तुपकर हे नाव संपूर्ण राज्याला परिचित आहे. शेतकरी चळवळीचा युवा चेहरा आणि आक्रमक नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांची ओळख आहे. राज्यातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांची फौज निर्माण केलेली आहे. चळवळीतील नव्या जुन्या सर्व प्रमुख पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांना त्यांनी आता एकत्र करण्याचा निर्णय घेत त्यांनी सातत्यानं शेतकरी प्रश्नांवरुन आवाज उठवला आहे. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानीतून हकालपट्टी झाल्यानंतर महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी या नव्या पक्षाची घोषणा केली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटेनत इतकी वर्ष काम केल्यानंतर आता रविकांत तुपकर यांनी आपली राजकीय दिशा बदलली. त्यांनी नव्या पक्षाची घोषणा करतानाच राजू शेट्टींवर टीकेची झोड उठवली होती. माझा असा काय गुन्हा होता की, माझ्यावर कारवाई झाली? माझ्यावर कारवाई केल्यानंतर राजू शेट्टींना सुखाची झोप लागली असेल. त्यांच्या वाटेतला काटा दूर झाला, असा टोलाही तुपकर यांनी यावेळी लगावला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात एका तालुक्यापुरती स्वाभिमानी शेतकरी संघटना होती. पण आम्ही तिला राज्यात नेलं. मात्र, स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी त्यांना वाटलं की, ते कारवाई करतात. त्यांनी आधी सदाभाऊ खोत यांना काढलं, नंतर देवेंद्र भुयार यांना काढलं.आता आज माझा नंबर लागला. छोट्या पक्षांचे नेते खूप असुरक्षित असल्याचे भावनिक उद्गार रविकांत तुपकर यांनी त्यावेळी काढले होते.
एकेकाळच्या या गुरू शिष्य राहिलेल्या दोन स्वाभिमानीच्या नेत्यांमध्ये वितुष्ट आलं होतं. पण आता कडूंच्या शेतकरी आंदोलनात तुपकर आणि शेट्टी हे दोन्ही कट्टर विरोधक असलेले नेते एकत्र दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.