Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News, Shivsena news, Political News
Uddhav Thackeray News, Devendra Fadnavis News, Shivsena news, Political News Sarkarnama
विशेष

दीपक केसरकरांनी तर बाॅंबच टाकला : भाजप-शिवसेना युती एका फोनसाठी थांबलीय....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी संयमाने बोलणारे नेते म्हणून आतापर्यंत ओळख मिळवली होती. पण त्यांनी एक धाडसी विधान करत केवळ मानपानामुळे शिवसेना आणि भाजप यांची युती अडल्याचे सांगत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. पहिला फोन कोणा करायचा, यावरून पुढचा संवाद अडल्याचेही त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येत असल्याचे दिसून येत आहे. (Shivsena Latest Marathi News)

केसरकर हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज दिल्लीत होते. एकनाथ शिंदे गटाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीनंकर त्यांनी हे विधान केले आहे. दोन्ही पक्षांपैकी पहिला फोन कोणी करायचा, यावर हे अडल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेेने काल पाठिंबा जाहीर केला होता. भाजपसोबत जुळवून घ्यावे, असा शिवसेना खासदारांचा दबाव असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला होता, असे बोलले जात होते. खुद्द ठाकरे यांनी आपण दबावापोटी हा निर्णय घेतल्याचे नाकारले होते. मात्र केसरकर यांनी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याचे सांगत राजकीय वर्तुळात बाॅंबच फोडला आहे.(Deepak Kasarkar Latest Marathi News)

केसरकर यांच्या या दाव्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नकार दर्शविला आहे. युतीबाबत वृत्त खोटं असल्याचे त्यांनी तातडीने स्पष्ट केले. "माध्यमांसाठी मोठे असलेले हे विधान शिवसेनेसाठी खोटं आहे. जनतेत भ्रम निर्माण करण्यासाठी असली विधानं केली जात आहेत. निष्ठावतं शिवसैनिक यांच्या भूलभुलैयाला बळी पडणार नाही. लोकांमध्ये थोतांड माजवून सहानभूती मिळवायची, अशी त्यांची नीती आहे", अशा शब्दात सावंत यांनी टीका केली.

दुसरीकडे केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर भाजपच्या कोणत्याही नेत्याने टीका करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दोन्ही मुले नितेश आणि ऩिलेश हे ठाकरेंवर टीका करत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर केसरकर यांनी हे दोघेही लहान आहेत. फडणवीस त्यांची समजूत काढतील, असे सांगितले. त्यावरून निलेश राणे चांगलेच भडकले आणि त्यांनी केसरकर यांना लिमिटमध्ये राहण्याचा इशारा दिला.

केसरकर यांचे तिसरे विधानही गाजले. शरद पवार यांनीच आतापर्यंत शिवसेनेत फूट घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावरून राष्ट्रवादीने केसरकर यांची खरडपट्टी काढली. जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांनी केसरकर यांचा समाचार घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT