- नेहा सराफ, वरिष्ठ प्रतिनिधी, सरकारनामा
Jayant Patil Vs Gopichand Padlkar : 'जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे', हे एवढे जहरी आणि खालच्या दर्जाचे वक्तव्य आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल हे वक्तव्य होते.
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. इस्लामपूर आणि परिसरात पडळकर यांच्याविरोधात मोर्चे निघत आहेत. दस्तुरखुद्द पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पडळकर यांच्याबद्दल तक्रार केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही यांनीही पडळकरांचा समाचार घेतला.
पण या टीकेनंतरही अजून एक शब्दही बोलले नाहीत ते स्वतः जयंत पाटील. गोपीचंद पडळकरांनी वडिलांचं नाव घेतल्यावर, अगदी वैयक्तिक टीका केल्यानंतरही जयंत पाटलांनी उत्तर दिलेलं नाही. मुळात असं वाट्टेल ते बोलण्याची पडळकर यांची सवय नवीन नाही. यापूर्वी शरद पवारांवरही त्यांनी अशीच टीका केली आहे. तरीही जयंत पाटील शांत राहतात.
पहिले कारण तर जयंत पाटील पडळकरांना बरोबरीचे मानतच नाहीत :
तुम्ही लढाई त्याच व्यक्तीसोबत करता जेव्हा त्याला बरोबरीचं मानता. इथं पडळकरांना उत्तर देऊन त्यांना आपल्या बरोबरीत आणायचंच नाही असं जयंत पाटलांनी ठरवलं असावं. म्हणूनच ते उत्तर देण्याच्या भानगडीत पडले नाहीत. अर्थात त्यांची स्टाईल बघितली तर ते संधी मिळेल तिथे पडळकरांचा वचपा काढणार हेही तितकंच खरं आहे.
कशाला मोठं करायचं?
पडळकर ज्या जिल्ह्यातून ते येतात तिथे त्यांना सुरुवातच प्रस्थापितांच्या विरोधात लढून करावी लागली आहे. आमदारकीची त्यांची पहिलीच टर्म आहे. पण अशावेळी त्यांची भाषा मात्र बोचणारी आहे. जयंत पाटील, अजित पवार, शरद पवार यांच्याबद्दल गेले अनेक वर्ष बोलत आहे. या सर्वांना अरेतुरे करून झालं आहे. यातून त्यांना तर प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र त्यांना उत्तर दिलं तर मोठं केल्यासारखं होईल, दखल घेतल्यासारखं होईल आणि तेच मुत्सद्दी जयंत पाटील करणार नाहीत.
पाव्हण्याच्या हातून साप मारला :
पाटील स्वतः बोलले तर ही लढाई ते विरुद्ध पडळकर इतकीच होईल. पण गप्प बसून त्यांनी भाजपच्याच लोकांना बोलणं भाग पाडलं. पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करणं, पडळकरांना फडणवीसांनी दिलेली समज, भाजपच्या सगळ्या प्रवक्त्यांनी मान्य केलेली चूक हे एकप्रकारे जयंत पाटलांच्या पथ्यावरच पडणारे आहे. शिवाय राज्यभर त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्तेही बोलत आहेतच. म्हणजे त्यांनी साप तर मारलाय पण पाहुण्याच्या काठीने.
कमी झालेली राजकीय ताकद :
राजकारण हा जितका दाखवण्याचा खेळ आहे त्याहून जास्त आकड्यांचा खेळ आहे. आत्ताच्या घडीला सांगलीवर एकहाती सत्ता असणारे जयंत पाटील जरा मागे पडलेत. यावेळी कधी नव्हे पाटलांचे मताधिक्य लक्षणीय कमी झालं आहे. त्यांच्या वैयक्तिक संस्था सोडल्या तर बाकी ठिकाणी तितकी ताकद राहिलेली नाही.
तरुण नेत्यांना ताकद देऊन भाजपने जयंत पाटील यांना चहूबाजूंनी घेरलं आहे. याला अजितदादांचीही ताकद मिळाली आहे. आता पडळकरांना फार अंगावर घेऊन उगीच ताकद वाढवण्याच्या फंदात ते पडत नाही. अर्थात म्हणून ते हातावर हात ठेवून बसलेत असाही अर्थ नाही. पण कमी झालेल्या ताकदीचा अंदाज त्यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्याला अर्थातच आहे.
टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम :
तर याच सगळ्या कारणांमुळे जयंत पाटील थेट बोलते झालेले नाहीत. फटकन बोलून मोकळं होणारी माणसं आणि विचार करून योग्य वेळी व्यक्त होणारी माणसं असा फरक असतो. यात दुसऱ्या प्रकारातली माणसं जास्त घातक असतात, जयंत पाटील हेही याच दुसऱ्या प्रकारातील व्यक्ती म्हणून ओळखले जातात.
उगीच अंगावर धावून जायचं नाही. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणारच असं जयंत पाटील नेहमी म्हणत असतात. आता पडळकरांनी पुन्हा बॉम्ब फोडलाय. त्यावर जयंत पाटील कसा करेक्ट कार्यक्रम करतात हेच बघावं लागणार.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.