Bhagat Singh Koshyari, Devendra Fadnavis
Bhagat Singh Koshyari, Devendra Fadnavis sarkarnama
विशेष

मी पुन्हा येईन, पुन्हा येईन.. : फडणविसांनी पुन्हा करून दाखवलं...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नवीन सरकारच्या स्थापनेसाठी भाजपने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भाजपने जोरदार घोषणा देत विजयाचा जल्लोष साजरा केला. फडणवीस हे आता तिसऱ्यांदा शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सभागृहातील महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रसंगही टाळला आहे. भाजपचे सर्व आमदार आणि नेते उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी हाॅटेल ताजमध्ये एकत्र आले होते. तेथे ठाकरे यांच्या राजीनाम्याची वार्ता येताच जल्लोष सुरू झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पेढा भरवून अभिनंदन केले.

मी पुन्हा येणार, हे फडणवीस यांचे विधान 2019 च्या प्रचारात गाजले होते. शिवसेना-भाजप यांची युती बहुमत घेऊन आलेली असतानाही शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला. फडणवीस यांचा फोनही ठाकरे यांनी सरकार स्थापनेच्या वेळी घेतला नाही. त्यावर चिडलेल्या फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला. हे सरकार तीन दिवसांपर्यंत चालले. त्यामुळे फडणवीस यांना तातडीने पायउतार व्हावे लागले.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांनी गेली अडीच वर्षे काम पाहिले. फडणवीस विरुद्ध ठाकरे सामना असा गेली अडीच वर्षे सुरू होता. हे सरकार जाणार, अशी घोषणा वारंवार केली जात होती. वेळोवेळी मूहूर्त दिले गेले. पण ते जात नव्हते. त्यामुळे फडणवीस यांची खिल्ली उडविली जात होती.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांनी महाविकास आघाडीला भगदाड पाडले. नंतर तर शिवसेनेतच फूट पाडली. एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांना भाजपसोबत आणण्याचे काम फडणवीस यांनी केले. ठाकरे सरकार पाडण्याची योजना फडणवीस यांनी गोपनीयतेने आखली. या कानाची त्या कानाला खबर नव्हती. शिवसेनेचे आमदार फुटल्याने ठाकरे यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फडणविसांचे आता नवीन शपथविधीसाठी सज्जा झाले आहेत.

भाजपच्या सर्व आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आता त्यांच्या मंत्रीमंडळात कोणते चेहरे असणार, याची उत्सुकता असणार आहे. तसेच बंडखोरांना किती स्थान मिळणार यावरही सरकारचे भवितव्य ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT