Congress Leader Meet Governor
Congress Leader Meet Governor Sarkarnama
विशेष

राज्यातील आंधळे, मुके, बहिरे सरकार बरखास्त करा : काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे. कारण, मागील तीन महिन्यांत शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी, महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला राज्यातील शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेत प्रचंड संताप आणि निराशा आहे, याबाबत काँग्रेसच्या (Congress) शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कानावर घातले. (Dismiss the Shinde-Fadnavis government in the state : Congress statement to the Governor)

विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, संदीप पांडे, व्हिजेएनटी विभागाचे अध्यक्ष मदन जाधव यांच्या शिष्ट मंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देत राज्य सरकार बरखास्तीची मागणी केली आहे.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले की, राज्यापुढची संकटे आणि जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश जिल्ह्यामध्ये खरीप पूर्णपणे वाया गेले आहे. कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मका, उडीद ही सर्वच पिके शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने वाढवली, त्याला खते आणि कीटकनाशके यासाठी मोठा खर्चही केला होता. मात्र, पिके हातात येण्याच्या आधीच वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या शेतकऱ्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदतीचे पॅकेज देण्याची आवश्यकता आहे. पण, अद्याप सरकारने ओला दुष्काळही जाहीर केला नाही आणि शेतकऱ्यांना मदतही दिली नाही.

एकीकडे निसर्गामुळे नुकसान तर दुसरीकडे सरकारचे दुर्लक्ष अशा दुहेरी संकटात राज्यातील शेतकरी सापडला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिला नाही. नैराश्यापोटी ते आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. राज्यात दर आठ तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. ऐन दिवाळीच्या सणात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राज्यातील एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली, ही राज्याला लाज आणणारी बाब आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी काँग्रेस पक्षाने अशा प्रकारे शिधा वाटप करण्यात मोठा भ्रष्टाचार होऊ शकतो, त्यामुळे थेट नागरिकांच्या खात्यात रोख रक्कम ३ हजार रुपये द्यावी अशी मागणी केली होती. पण, सरकारने शिधा वाटपाचा निर्णय घेतला. दिवाळी संपून गेली तरी अद्याप लोकांना आनंदाचा शिधा मिळाला नाही. काहींना शिधा मिळाला पण त्यात कुठे साखर नव्हती, कुठे तेल नव्हते तर कुठे रवा नव्हता. जे साहित्य दिले ते अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. या शिधा वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून लोकांची दिवाळी कडू करण्याचेच काम राज्य सरकारने केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT