<div class="paragraphs"><p>Sharad pawar</p></div>

Sharad pawar

 

Sarkarnama

विशेष

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पवारांच्या फोनमुळे पुढे गेली? : त्यांनीच दिले उत्तर

सरकारनामा ब्यूरो

पुणे : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून मंगळवारी (ता. २८ डिसेंबर) राज्याच्या राजकारणात मोठा पेचप्रसंग उभारला होता. पण ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री व इतरांना फोनवरून सल्ला दिला आणि त्यातून महाविकास आघाडी सरकारने ही निवडणूक पुढे ढकलली, अशी चर्चा माध्यमांसह सोशल मीडियात आज (ता. २९ डिसेंबर) दिवसभर होती. त्याला खुद्द पवारांनीच उत्तर दिले आहे.

शरद पवार हे आज एका मुलाखतीत बोलत होते, त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात काही घडलं की त्यामागे पवारांचा हात आहे, असे म्हटलं जातं, त्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देत असताना पवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा दाखला दिला.

ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधीमंडळात मंगळवारी (ता. २८ डिसेंबर) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काही मतभेद झाले. त्यानंतर ते मार्गस्थ लागलं आणि स्पीकरचं इलेक्शन टळलं. पण, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये बातमी आली की शरद पवारांनी सल्ला दिला आणि त्या ठिकाणच्या परिस्थितीमध्ये बदल झाला. ही गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझं थोडं बोलणं झालं होतं. पण असं करा किंवा तसं करा, असं मी यत्किंचीतही सांगितलं नव्हतं. पण सगळ्या वर्तमानपत्रांनी या सर्व प्रकरणाच्या मागे माझा काहीतरी हात आहे, अशी भूमिका मांडली आहे. ही नेहमीची गोष्ट आहे, त्यात नवीन काही नाही. माझा हात फार लांब आणि तो कुठेही जातो, असं दिसतंय. पण मला त्याची चिंता वाटत नाही.

राज्यात काही घडलं की त्यामागे पवारांचा हात असतो, असं बोललं जातं. असं काही असतंय का या प्रश्नावर स्मितहास्य करत पवार म्हणाले की, येथे आमचे मित्र बसले आहेत, आम्ही सांगतो, त्यांचा हात आहे, असे सांगून त्यांनी हा प्रश्न टोलवून लावला.

...म्हणून मी केंद्रातून राज्यात पुन्हा आलो

दरम्यान, याच मुलाखतीत बोलताना त्यांनी केंद्रातून पुन्हा महाराष्ट्रात येण्याची आपली इच्छा नव्हती, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीत काम पाहत असताना शरद पवार हे जानेवारी 1993 मध्ये पुन्हा महाराष्ट्रात चौथ्यांदा मुख्यमंत्री म्हणून परत आले. राष्ट्रीय नेता म्हणून शरद पवार पुढे येत असताना त्यांना पुन्हा राज्यात यावे लागले. त्याचे कारण पवार यांनी आज सांगितले.

``बाबरी मशीद सहा डिसेंबर 1992 मध्ये पडल्यानंतर राज्यात दंगली सुरू झाल्या होत्या. माझं राज्य जळत होते. ते रोखण्यासाठी तुमच्यासारखा नेता हवा, असे सांगत मला इमोशनलं केलं गेलं. माझी राज्यात परत यायची नव्हती. पण राज्य सावरण्यासाठी मी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली, अशी आठवण पवार यांनी आज पुण्यात एका मुलाखतीत सांगितली. त्यासाठी मला सहा साडेसहा तास आग्रह सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT