Sharad Pawar-Balasaheb Thackeray
Sharad Pawar-Balasaheb Thackeray Sarkarnama
विशेष

मी आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांवर तुटून पडायचो! पण संध्याकाळी भेटल्यानंतर...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सत्ता गेल्यानंतर व्यक्तीमध्ये कसा बदल होतो आणि ती व्यक्ती कशी अस्वस्थ होते, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव न घेता सांगितले. तसेच जुन्या आठवणी जागवत तेव्हाचे विरोधक कसे वागत होते, हे पण जागविले. त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आठवणी त्यांनी आवर्जून सांगितल्या.

सत्ता येते, सत्ता जाते मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही असा अनुभवाचा सल्ला शरद पवार यांनी दिला. ते म्हणाले की, “मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंसोबत माझे जाहीर मतभेद असायचे. त्यावेळी एकमेकांसाठी शब्द वापरण्यात कोणतीही काटकसर आम्ही दोघांनीही केली नाही. परंतु बैठक संपल्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र भेटायचो. औरंगाबादच्या एका सभेतही आम्ही एकमेकांच्या वक्तव्यावर तुटून पडलो होतो. पण नंतर ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते, अनंतराव भालेराव यांच्यासोबत नंतरची संध्याकाळ जायची. तेव्हा सभेत बोलल्या गेलेल्या गोष्टींचे स्मरणही आम्ही करत नसू. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून राजकारणाची ही संस्कृती महाराष्ट्रात होती. मात्र आता दुर्दैवाने ती हरवत चालली आहे.”

यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांची विधिमंडळातील चर्चा अत्यंत टोकाची असायची. पण ही मंडळी चर्चा संपल्यानंतर पुन्हा एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायची. मात्र अलीकडच्या काळात दुर्दैवाने नाही त्या गोष्टी बघायला मिळत आहेत, अशी खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातील मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. परंतु त्यांचे एकेरी नाव घेऊन त्यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलणे शोभत नाही. मुख्यमंत्री ही एक संस्था आहे. या संस्थेचा वकूब कायम ठेवण्याची गरज आहे. परंतु ते न ठेवण्याची भूमिका काही लोक घेताना दिसत आहेत, अशी बाब पवार यांनी निदर्शनास आणून दिली. दुसऱ्या बाजूने एखादा धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही तुमच्या निवासस्थानी करु शकता. मात्र तो कार्यक्रम आम्ही तुमच्याच दारात येऊन करू, हे म्हणणे काही उचित नाही. अशा प्रकारचा विद्वेष, मतभेद वाढू नये यासाठी आपण काळजी घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

विरोधी पक्षाकडून होणाऱ्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर पवार साहेबांनी मत व्यक्त केले. सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात, प्रत्येकजण काही माझ्यासारखे नसते असा टोला पवार साहेबांनी लगावला. १९७८-८० च्या वेळी माझं सरकार बरखास्त केलं गेलं. ही बातमी मला मुख्य सचिवांमार्फत रात्री १२.३० वाजता कळली होती. १२.३० वाजता मी तीन-चार मित्रांना बोलवलं आणि घरातलं सामान आम्ही हलवलं. सकाळी सात वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो. त्यानंतर सकाळी दहा वाजता वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध इंग्लंड मॅच पाहायला गेलो आणि मॅचचा आनंद लुटला. सत्ता येते, सत्ता जाते, मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची गरज नाही. मात्र काही लोक तरीही अस्वस्थ राहतात. मी पुन्हा येणार असं जाहीररीत्या बोलूनही ते घडू शकले नाही त्यामुळे त्यांचे अस्वस्थ राहणे साहजिक आहे. परंतु, त्यांनाही या परिस्थितीतून काय परिणाम होतात हे लक्षात येईल व राज्यात योग्य वातावरण निर्माण व्हायला त्यांचेही सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT