राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरील X माध्यमावर लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याविषयी मोठी माहिती दिली आहे.ते पोस्टमध्ये म्हणतात,'महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत,मंगळवारी (ता.24 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे, असंही तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीतील मतदानातील गोंधळावर काँग्रेसने तक्रार केली होती. काँग्रेस शिष्टमंडळाने तशी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या या तक्रारीवर आता 66 पानी उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे सर्व आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत. काँग्रेसने राज्यातील मतदार यादीतील घोळ, बोगस मतदान तसेच सायंकाळचे वाढलेल्या मतदानावरील आक्षेप घेतले होते. निवडणूक आयोगाने ते फोटाळले आहेत.
कल्याणमधील भाजप पदाधिकारी हेमंत परांजपे हल्ला प्रकरणात बाजारपेठ पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. संदीप महाले आणि सूरज भालेराव, असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात आणखीन तीन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. परांजपे यांच्यावर हल्ला का केला? कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला केला? या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा तपास बाजारपेठ पोलिस करत आहेत. एका लग्न समारंभात परांजपे यांच्यासोबत झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हेमंत परांजपे यांना हल्लेखोरांनी दगडाने मारहाण केली होती. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण समोर आलं आहे.
काँग्रेसमधून निलंबित केलेले काँग्रसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले असून आता काँग्रेसने इंडिया आघाडीच अध्यक्ष पद सोडण्याचा विचार केला पाहिजे, असं म्हटलं आहे. यावर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. "मणिशंकर अय्यर यांनी कोणताही सल्ला देऊ नये. त्यांनी दुसऱ्यांसोबत काय गोंधळ घालायचा तो घालावा. त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. काय निर्णय घ्यायचा तो काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी घेतील", असे यशोमती ठाकूर यांनी म्हंटले आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यात या पदासाठी स्पर्धा आहे. यावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, मी कधीही म्हटलं नाही की, मला नाशिकचे पालकमंत्री व्हायचा आहे. मला पालकमंत्री पदाबाबत कुठलाही आग्रह नसून मला जिथे देतील तिथे मी काम करेल. परंतु कुंभमेळा 12 वर्षांनी पार पडणार असून गेल्यावेळेस अतिशय सुंदर नियोजन केले होते. समुद्रापार त्या कार्यक्रमाची चर्चा झाली होती. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री जर झालो, तर चांगलंच आहे".
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील उद्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात जात, मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. जरांगे पाटील उद्या दुपारी बीडमध्ये पोचतील. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण दाबू देणार नाही, असा इशारा देत 28 तारखेला बीड इथं होणाऱ्या मोर्चामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं.
विधानसभा निवडणुकीला तिसरी आघाडी म्हणून समोरे गेलेले प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांना पराभवाला समोरं जावं लागलं. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महायुतीच्या या बहुमतामुळे राज्याच्या राजकारणात इतर पक्ष सावध झाले असून, महायुतीशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू भेट घेतली. नितीन गडकरी यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी बच्चू कडू दाखल झाले. बच्चू कडू आणि नितीन गडकरी यांच्या भेटी मागे नेमकं काय कारण होतं, हे अजून समोर आलेलं नाही. या भेटीवर बच्चू कडू काय प्रतिक्रिया देतात याकडे आता लक्ष लागले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी पोलिस ठाण्यांतर्गत साठगाव, हिवरा आणि नागपूर जिल्ह्यातील बोरगाव इथल्या शेकडो महिलांनी जिल्ह्याच्या सीमेवर सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद पडली. ज्या झोपडीतून दारूविक्री व्हायची, ती झोपडीही महिलांनी पेटवली. शेवटी पोलिसांनी दाखल होत दोन पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतलं. घटनेच्या वेळी महिला संतप्त झाल्या आणि त्यांनी शेकडो दारूच्या बाटल्या फोडल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी तीन हजार रुपयांची दारू जप्त केली.
मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 'शिव सर्वेक्षण यात्रा' सुरू करण्यात आली होती. मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला असून, जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देऊन शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहे. तसेच त्यांची मते जाणून घेणार आहेत. समोर कुणीही असले तरी लढणे थांबविणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे दिसते. विधानसभेतील अपेक्षित यश मिळाले नसले, तरी त्यातून खचून न जाता उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी केली आहे. तसेच राज्यात आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला मैदानात उतरले आहेत.
उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून, मद्यधुंद चालकाने कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. कारच्या धडक दिलेल्या वाहनांची चक्काचूर झाला आहे.
परभणी हिसांचारानंतर ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. याप्रकरणी सूर्यवंशी कुटुंबियांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, राज्य सरकार देखील राहुल गांधींच्या आरोपांविरुद्ध आक्रमक झाले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट आज परभणीतील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहे.
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील ज्येष्ठ तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात डावलल्याने ते नाराज आहे. छगन भुजबळ यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून यातून मार्ग काढणार असल्याचे आश्वासन मिळाले. तसंच भुजबळांनी देखील आठ ते दहा दिवसांत भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. आता छगन भुजबळ परिवारासह परदेश दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर आले आहे. नाराज असताना छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर जाणे आणि त्यानंतर भूमिका मांडणार, अशी भूमिका घेतल्याने छगन भुजबळांचा हा परदेश दौरा चर्चेत आला आहे. छगन भुजबळ यांना परदेश दौऱ्यासाठी परवानगी मिळाली आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर सकाळी पत्रकार परिषद घेतली. हत्येमधील मुख्य आकाला लवकर अटक करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही घेतल्यास आनंद होईल, असेही आमदार धस यांनी म्हटले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी SIT स्थापन झाली आहे. आरोपींना 15 दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्याचे समाधान आहे. पोलिस, सीआयडी, सर्वच आरोपींच्या मागावर आहेत. मोकोको अंतर्गत कारवाई होत आहे. हत्येतील मुख्य आका लवकरच अटक केली पाहिजे. हत्याप्रकरणात मुख्यमंत्री यांनी सभागृहात केलेले निवेदन अतिशय सकारात्मक आहे. एका दिवसात बीडच्या पोलिस अधीक्षकांची बदली झाली. आता बीड जिल्ह्यातील पोलिसांची प्रतिमा बदलली पाहिजे, अशी अपेक्षा आमदार धस यांनी व्यक्त केली.
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते मंत्री दादा भुसे यांनी गेल्या कामांचा दाखला देत, पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. तर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद रंगला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक पार पाडली. महविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. मोर्चा 28 डिसेंबरला काढण्यात येणार आहे. या बैठकीत मयत संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगी वैभवी हे देखील हजर होते. वैभवी देशमुख संवाद साधताना अतिशय भावनिक झाली होती. दरम्यान, 'तुमची मला गरज आहे, माझे काका एकटे नाही लढू शकणार, तुम्हा सगळ्यांच्या साथीची मला सध्या गरज आहे', अशी साद वैभवी संतोष देशमुख हिने घातली.
महायुती सरकारमधील मंत्र्यांना दोन दिवसात मुंबई मंत्रालयातील दालन आणि बंगले वाटप करण्यात आले. विश्वासात न घेता बंगले आणि दालन वाटप केल्याने काही मंत्री नाराज आहेत. बंगले, दालन वाटपाचे थेट आदेश आल्याने काही मंत्री गडबडून गेले आहेत. दरम्यान, महायुती सरकारच्या 42 मंत्र्यांपैकी 22 मंत्र्यांसाठी लागणारी नवीन दालने निर्माण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.