माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत बेपत्ता झाल्याच्या बातम्या समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता ऋषिराज सावंत पुण्यात दाखल झाला आहे.
माजी मंत्री, शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋतुराज सावतं हा बेपत्ता आहे. त्याचे अपहरण झाल्याचा फोन फोन कंट्रोल रुमला आला होता. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून ऋतुराज याचा शोध घेतला जात आहे. तो मित्रांसोबत पुणे विमानतळावर गेल्याची माहिती आहे. मात्र, तेथून तो बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस ठाण्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी पोलिसांना माफ करण्याची मागणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबांकडे केल्याचे आरोप होत होता. धस यांचा त्या संदर्भातील जाहीर सभेतील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मात्र, यावर धस यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. धस म्हणाले, माझे म्हणणे येवढेच होते की जे यामध्ये दोषी आहेत त्या पोलिसांवरच कारवाई व्हावी, जे पोलिस यामध्ये नव्हते त्यांची देखील नावे यामध्ये आली आहेत. त्यांना माफ करण्या संदर्भात मी बोललो होते.
विधानसभा निकालावरुन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणूक आम्हाला अजूनही मान्य नाही. जाईल तिथे लोक हे कसे शक्य आहे? असा प्रश्न मला विचारत आहे. अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला तर अनेक लोक झोपेत उठून प्रतिक्रिया द्यायला आले. एवढ्या दिवस झोपलेले आता जागे झाले आहेत. हे दळभद्री सरकार काय काम करतय बघा. लाडकी बहीण योजना आणली. परंतु आता किती महिलांना डावलले जात आहे. योजना सांगितल्या त्या किती? आता सुरु आहेत किती? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
पंकजा मुंडे या जर म्हणत असतील की मुंडेंचे समर्थक एकवटले की एक पक्ष तयार होईल तर मग माझा त्यांना प्रश्न आहे. येत्या काळात त्या भाजप सोडणार आहेत का? विधान परिषद सोडणार आहेत का? आणि मंत्रीपदही सोडणार का? तेव्हा जाऊनच त्यांना ओबीसींचा नवीन पक्ष काढता येईल, असा टोलाही यावेळी अंजली दमानिया यांनी लगावला.
गडावर कोणालाही बोलवा. माझी हरकत नाही. गडाच्या विकासासाठी मी सदैव तयार आहे. जोपर्यंत लोक सांगतील तोपर्यंत मी काम करणार आहे. लोकांनी नाही म्हटल्यावर मी घरच्या गादीवर बसले. आपले तत्व आपल्यासाठी आदर्श असतो. मी गुंडांसाठी गुंड, कोणालाही घाबरत नाही, असे राज्याच्या पर्यटन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत माजी मंत्री सुभाष देसाईही आहेत. आज सकाळीच फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर काही तासांत उद्धव ठाकरेंचे विश्वासू नार्वेकर फडणवीसांची भेट घेत असल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
एका कार्यक्रमात आई-वडिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीस अलाहबादिया याची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या विधानावरून तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून लगेचच चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास परवानगी देण्यात आली. जल लवादाकडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कोणत्याही राज्याचा त्याला विरोध नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
बीआरएसच्या के. कविता यांनी तेलंगणातील ओबीसी जातीय गणनेवरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्षाने ओबीसींची जातीय गणना केल्याचा दावा केला आणि त्यांना 42% आरक्षण देण्याचे आश्वासन दिले, मात्र ही बाब सत्यापासून कोसो दूर आहे," असे कविता यांनी म्हटले आहे. कविता यांनी आरोप केला की, "सरकारने जाहीर केलेल्या जातीय गणनेत अनेक त्रुटी आहेत आणि या विषयावर सतत आंदोलन करणाऱ्या अनेक संघटनांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. आम्ही सरकारकडून विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या चुकीच्या आकडेवारीचा निषेध करतो."
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी सकाळी प्रयागराज महाकुंभात पोहोचल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी येथील संगमात स्नान केले. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले.
OBC पक्ष निघत असेल तर विचार करायला हरकत नाही, छगन भुजबळांचं पंकजा मुंडेंच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते पॅरिसमध्ये होणाऱ्या एआय समिटमध्ये सहभागी होतील. संरक्षण सहकार्य आणि व्यापार भागीदारी वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी हे दौरे करत आहेत. या दौऱ्यानंतर ते थेट अमेरिकेला रवाना होतील.
भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमागे राज ठाकरेंसोबत राजकीय भेट नाही बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केलं.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकताच भेट घेतली. यावरून अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. याच भेटीवरून शिवसेनेचे (शिंदे) मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सामंत यांनी, ते विकासाचे राजकारण करतात, कुणीही असले तरी ते चर्चा करतात. राज साहेबांचा काही प्लॅन असेल तर तो विचारायला ही भेट होती. आता राज ठाकरे यांच्याकडे आमदार खासदार नाही, तरी भेट होते होऊ द्या. आमच्यावर याचा काही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अनादरकारक वक्तव्य करणं महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखं आहे. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही! हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथे गद्दारी खपवून घेतली जाणार नाही! महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावेच लागेल!, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली आहे.
राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे उघडलाय, तिथं लोकं चहा पिण्यासाठी जात असतात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. हा टोला देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून लगावला आहे.
नवी मुंबई महापालिकेचे 5 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. ते आजपासूनच संपावर जाणार असून समान वेतनासह विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे नागरी सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या शेतकऱ्यांची लूट बनावट खतांमधून केली जातेय. कोल्हापूरमधील खुपिरे गावामध्ये देखील असा बनावट खताच्या 77 बॅगा जप्त करण्यात आल्या असून हा मुद्देमाल सव्वा लाख रुपये किमतीचा आहे. तर प्यारादीप फॉस्फेट खताच्या बॅगमध्ये दुसऱ्याच कंपनीचे खतं सापडले असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील रंगभैरव शेती सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दुकानदार आकाश गणपती नाळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असे वक्तव्य राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. त्यावरून आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, पंकजा मुंडेंनी वेगळा पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे संजय राऊत म्हटले आहे.
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान करून वादंग निर्माण केला आहे. यावर संजय राऊत यांनी राहुल सोलापूरकर यांचा संबंध संघाशी आहे. आधी छत्रपती शिवाजी महाराज, मग बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत विधान केलं. आधी विधान करायचं आणि मग माफी मागायची ही त्यांची पद्धत आहे, असा टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांचा राजकीय वावर संपत चाललाय. त्यामुळे ते कोणावरही बोलतात आणि त्यांचाकडे कोण जातील याला आता फारस महत्त्व राहिलेलं नाही, असे म्हटलं आहे
अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी दोन दिवसांत दोन माफीनामे देण्याची नामुश्की ओढावून घेतलीय. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे सोलापूरकर यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मुंबईतील ऐरोली इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जाहीर मेळावा झाला. यावेळी काँग्रेसचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे, त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनवणे, माजी नगरसेविका अनिता माळवदकर, अनिकेत म्हात्रे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यादांच राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट चर्चेत आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांना सल्ला दिला आहे. सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. 'आपली पोळी भाजण्याची सवय चांगली नाही', असे आव्हाडांनी धस यांना सुनावले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून तीन दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आज आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राॅन यांच्या निमंत्रणावरून मोदी हे देशाला भेट देत असून, मंगळवारी होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता कृती परिषदेत ते सहभागी होणार आहे.
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज भेट देणार आहे. त्या त्रिवेणी संगमावर स्नान करून पूजाही करणार आहे. यानंतर त्या येथील काही मंदिरांना भेट देऊन नंतर त्या डिजिटल कुंभ अनुभव केंद्राची पाहणी करतील, असे राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले.
समृद्धी महामार्ग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आता येथील अवैध ढाबे आणि हॉटेल्समुळे पुन्हा चर्चेत आले आहे. महावितरण कंपनीने या अवैध ढाबे आणि हॉटेल्सना मेहरबानी दाखवली आहे. अनेक अवैधरित्या अवैध ढाबे आणि हॉटेल्सना विद्युत जोडणी झाल्याचे उघड झाले असून महावितरण कंपनी किंवा समृद्धी महामार्ग प्रशासनाने यावर कारवाई केलेली नाही.
बीड गुंडांसोबत पोलिस अधिकाऱ्यांची उठबस होती. त्यांनीच अभय दिले. त्यामुळेच हत्येची घटना घडल्याचा गंभीर आरोप मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला. सर्वात मोठे पाप हे केज पोलिसांनी केल्याचेही ते म्हणाले.
अभिनेता सैफ अली खान हल्ल्यातील आरोपी बांगलादेशी निघाला. यानंतर मुंबई पोलिसांनी बांगलादेशींच्या धरपकडच्या कारवाईला वेग घेतला आहे. मुंबई पोलिसांच्या 14 पथकांनी 24 तासांत 20 बांगलादेशींवर कारवाई केली आहे. आणखी काही बांगलादेशी रडारवर आहेत.
महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली असल्याची टीका भाजप मंत्री आशिष शेलार केली. मंत्री आशिष शेलार नाशिक दौऱ्यावर होते. मविआमधील पक्ष स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. जनतेच्या प्रश्नांवर विकासात्मक काम करण्याची त्यांची इच्छा नसते, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.