Kirit Somaiya  Sarkarnama
विशेष

मुंबईत मराठी माणसांना केंद्राच्या आदेशाने गोळ्या घालणार, असा त्याचा अर्थ! : राऊत संतापले!

किरीट सोमय्या यांच्यावर दुसऱ्यांदा झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल ‘सीआयएसएफ’ने घेतली आहे. यापुढे असा हल्ला झाल्यास हल्लेखोरांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याबाबत निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर दुसऱ्यांदा झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल ‘सीआयएसएफ’ने घेतली आहे. यापुढे असा हल्ला झाल्यास हल्लेखोरांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याबाबत निर्णय झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसावर केंद्रीय पोलिस केंद्राच्या आदेशाने गोळ्या घालणार, हा त्याचा अर्थ आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे. (Marathi people will be shot in Mumbai by Centre's order : Sanjay Raut)

संजय राऊत म्हणाले की, सोमय्या प्रकरणात ‘सीआयएसएफ’ची ऑर्डर म्हणजे आमच्या मराठी माणसांवर केंद्राचे, दिल्लीचे पोलिस हे मुंबईत गोळ्या घालणार, असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही काहीही करायचं आणि आम्ही प्रतिकार करायचा नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसांवर केंद्रीय पोलिस केंद्र सरकारच्या आदेशाने गोळ्या घालणार, मोरारजी देसाई यांनी हेच केलं होतं.

मुंबई केंद्रशासित करण्याचा जो डाव मी म्हणतो, तो हाच आहे. त्याचे सूत्रधार किरीट सोमय्या हे आहेत; म्हणूनच त्यांना हे पोलिस संरक्षण आहे. मुंबईवरील मराठी माणसाचा पगडा हा कायमचा काढण्यासाठी हे सगळं सुरू आहे. मुंबई त्यांना केंद्रशासित करायची आहे. त्याचं एक प्रेझेंटेशन किरीट सोमय्या आणि इतर ५ अमराठी लोकांनी गृहमंत्र्यांना सादर केले आहे. त्या संदर्भातील या हालचाली सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी पुन्हा केला.

काय आहे सीआयएसएफचा आदेश?

किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात हल्ला झाला होता, त्यानंतर ता. २३ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा मुंबईत हल्ला झाला. त्यानंतर ‘सीआयएसएफ’ने या हल्लाची गंभीर दखल घेतली आहे. यापुढे असा हल्ला झाल्यास हल्लेखोरांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सीआयएसएफच्या कमांडो विभागाने हल्ल्याच्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज मागितले असून सीआयएसएफच्या कमांडर यांनी याबाबत मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा केली असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी सीआयएसएफच्या जवानांवर असा हल्ला रोखण्याची प्राथमिक जबाबदारी असते. सुरुवातीच्या टप्प्यात हल्लेखोरांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागतो, अशी कायद्यात तरतूद आहे. सुरक्षा दलांना थेट गोळ्या घालण्याच्या आदेशाची अमंलबजावणी अतिशय दुर्मिळातील दुर्मिळ घटनेमध्ये करता येते, असे सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक झाल्यानंतर सोमय्या त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी खार पोलिस स्टेशनजवळ सोमय्या यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या गाडीची काच फुटली असून त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT