<div class="paragraphs"><p>Modi in Varanasi</p></div>

Modi in Varanasi

 

Sarkarnama 

विशेष

औरंगजेब बाहेरून आला तरी शिवाजीही येथेच जन्मले...अहिल्यादेवींचाही प्रेरक उल्लेख

सरकारनामा ब्यूरो

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) य़ांनी काशी विश्वनाथ काॅरीडाॅरचे आज उद्घाटन केले. (PM Narendra Modi to inaugurates Shri Kashi Vishwanath Dham) छत्रपती शिवाजीमहाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्य कामाचा आदरार्थी उल्लेख करत आतापर्यंत काशीनं जेव्हा कूस बदलली तेव्हा देशाचे भाग्य देखील बदलले, अशा शब्दांत या शहराचा गौरव केला. नव्या भारताला त्याच्या संस्कृतीचा अभिमान असून स्वतःच्या क्षमतांवर देखील विश्वास आहे. या नव्या देशात विरासत (वारसा) आणि विकास दोन्ही आहेत.

काशीमध्ये फक्त ज्याच्या हाती डमरू आहे केवळ त्याचीच सत्ता चालते. परकी आक्रमकांनी हे मंदिर अनेकदा तोडण्याचा प्रयत्न केला पण त्याचे अढळस्थान कायम राहिले. आमच्या देशात जर औरंगजेब बाहेरून येत असेल तर शिवाजी महाराज देखील येथेच जन्म घेतात,`` असे सांगत नव्या विचारांचा डमरू वाजविला. विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या शिवलिंगधारी पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याही कामांची आठवण मोदींनी काढली. जेव्हा विश्वनाथ मंदिर पाडण्यात आले तेव्हा ते अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा बांधले, ज्यांची कार्यभूमी महाराष्ट्रात होती. 250 वर्षांपूर्वी त्यांनी काशीसाठी इतकं काम केलं, त्यानंतर आता काशीसाठी इतकं काम होत आहे, असा उल्लेख त्यांनी केला.

समस्त काशीवासियांचे स्वागत करत आणि बाबा विश्वनाथ आणि कालभैरव यांना वंदन करताना मोदी म्हणाले की,‘‘ काशीमध्ये प्रवेश करणारा प्रत्येक व्यक्ती ही सर्वबंधनातून मुक्त होते. आज या नगरीमध्ये संकल्पाचे अनोखे सामर्थ्य पाहायला मिळत आहे. येथे गंगा उत्तरवाहिनी होत विश्वनाथाचे पाय धुण्यासाठी येते पण बदललेल्या परिस्थितीमुळे त्यात व्यत्यय येत होता. विश्वनाथधामचे काम पूर्ण झाल्याने आबाल वृद्धांना दर्शन घेणे अधिक सुलभ होईल. याआधी दर्शन घेण्यासाठी लोकांना अनेक तास रांगेमध्ये उभे राहावे लागत असत, आता त्यांचा हा त्रास टळणार आहे. याआधी या मंदिराचा परिसर केवळ तीन हजार वर्गफूट एवढा होता आता तो पाच लाख वर्गफूट एवढा करण्यात आला आहे. मी वाराणसीमध्ये आलो तेव्हा एक विश्वास घेऊन आलो होतो. हा विश्वास येथील लोकांवर होता. अनेकांनी स्वार्थापोटी या शहरावर आरोप केले. पण काशी शेवटी काशी आहे. ती अविनाशी आहे. काशीमध्ये ज्यांच्या हातात डमरू आहे फक्त त्यांचेच सरकार आहे.’’

मोदींनी फुले उधळली

या विश्वनाथधामच्या निर्मितीसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कामगारांचे पंतप्रधान मोदींनी विशेष आभार मानले. कामगारांच्या मेहनतीमुळे ही वास्तू साकार झाली असून कोरोनाच्या प्रतिकूल काळामध्ये हे निर्माण कार्य थांबू न दिल्याबद्दल मोदींनी त्यांचे कौतुकही केले. पंतप्रधानांनी यावेळी कामगारांवर फुलांचा वर्षाव केला, त्यानंतर त्यांच्यासोबत भोजन देखील केले. या विश्वनाथ धाम प्रकल्पावर तब्बल आठशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

मोदी म्हणाले

राजवटी आल्या गेल्या पण काशी शाश्वत

काशीत मृत्यू मंगल आणि सत्य हेच संस्कार

काशीबाबत बोलताना मी नेहमीच भावुक होतो

शास्त्रांनी जे सांगितले त्याही पुढे काशीनगरी

येथे जीवत्वाला थेट शिवत्वाशी जोडले जाते

काशीच्या कणाकणामध्ये विश्वनाथाचे वास्तव्य

विश्वनाथाला अभिषेक

पंतप्रधानांच्या दोन दिवसीय वाराणसी दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. ते सकाळी पावणेअकराच्या सुमारास काशीनगरीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कालभैरव मंदिरामध्ये पूजा केली, या विधीनंतर ते पायीच खिडकिया घाटापर्यंत गेले. पुढे तेथून क्रूझमध्ये बसून ललिता घाट येथे गेले, येथील गंगाजल घेऊन ते विश्वनाथ धाम येथे आले. यापूर्वी त्यांनी गंगेमध्ये स्नान देखील केले. या गंगाजलानेच त्यांना विश्वनाथाला जलाभिषेक केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT