Devendra Bhuyar-Raju Shetti
Devendra Bhuyar-Raju Shetti  Sarkarnama
विशेष

राजू शेट्टींनी स्वतःसाठी पवारांकडे कॅबिनेट मंत्रिपद मागितल्याचा देवेंद्र भुयारांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी शिष्टमंडळ पाठवून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे स्वतःसाठी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर केला. (Raju Shetty had asked sharad Pawar for a cabinet post for himself : Devendra Bhuyar)

देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार आहेत. पक्ष निवडणुकीनंतर संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका ठेवत संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भुयार यांची हकालपट्टी केली आहे. त्यावेळी त्यांनी ‘ज्या पोरावर विश्वास टाकला, तो बिनकामाचा निघाला,’ अशी टीकाही शेट्टींनी केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत भुयार यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यावेळी एका आमदाराला मंत्रिपद मिळावे, यासाठी शेट्टी यांनी आग्रह धरला होता. भुयार यांना मंत्रिपद न मिळाल्याने शेट्टी आणि पक्षातील इतर नेत्यांबरोबर त्यांचे खटके उडत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला भुयार हे खिशाला लावत नसल्याची चर्चाही होत होती.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी माझ्या मतदारसंघात फक्त सहाच तास प्रचार केला होता. देवेंद्र भुयार यांना निवडून आणले म्हणून सांगणाऱ्या राजू शेट्टी यांना स्वतःच्या कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांची अनामत रक्कम का वाचवता आली नाही, असा सवालही आमदार भुयार यांनी उपस्थित केला. राजू शेट्टी यांनी आजपर्यंत फक्त सोयीच्याच भूमिका घेतल्या आहेत. त्यांना आता पुन्हा भाजपशी जवळीक साधायची आहे, असा आरोपही देवेंद्र भुयार यांनी या वेळी केला.

वरूड-मोर्शी मतदारसंघातून मला निवडून आणल्याचे राजू शेट्टी सांगत असले तरी माझ्या मतदारसंघात त्यांनी केवळ सहा तासच माझा प्रचार केला होता. शेट्टींनी केवळ सहा तासांतच चमत्कार करून दाखवला असेल तर तो चमत्कार त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात का करून दाखवता आला नाही, असे सवालही भुयार यांनी उपस्थित केला आहे.

महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक पथक पाठवून शरद पवार यांच्याकडे राजू शेट्टी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली होती. पण, राजू शेट्टी हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेऊन कॅबिनेट मंत्री करणे शक्य नसल्याचे पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे विधानसभा सदस्य म्हणून मला मंत्रीपद देण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली होती. त्यावेळी मात्र शेट्टी यांनी राज्यमंत्रीपदाचा विषय बाजूला ठेवून आम्हाला काहीच नको, असे सांगून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अशी भूमिका त्यांनी घेतली होती, असे देवेंद्र भुयार यांनी नमूद केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT