Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
विशेष

लोकसभेला व्होट आणि नोट मिळविणाऱ्या सदाभाऊंनी अनुभवला सोलापुरी हिसका!

प्रमोद बोडके

सोलापूर : लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या (मतदार) प्रेमाचा अनुभव घेतलेल्या माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना दोनच दिवसांपूर्वी सोलापुरी (Solapur) हिसकादेखील सहन करावा लागला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात लढलेल्या सदाभाऊंना सोलापूर जिल्ह्याने व्होटबरोबर नोटांचे दानही भरभरून दिले होते. खुद्द सदाभाऊही अनेकदा आपल्या भाषणातून ते सांगत असतात. मात्र, तुळजापुरात केतकी चितळेचे जोरदार समर्थन करणाऱ्या सदाभाऊंना सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) रुद्रावतार पाहून सारवासारव करण्याची वेळ आली. (Sadabhau Khot's softening in face of aggression of the Nationalist Youth Congress)

ज्येष्ठ नेत शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिचे उघड समर्थन आमदार सदाभाऊ खोत यांनी तुळजापुरात बोलताना केले होते. त्यावेळी बोलताना खोत यांनी केलेले हातवारे आणि टेबलावर वारंवार टाकलेली थाप हे सदाभाऊंची मनस्थिती सांगून जाणारे होते. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात अत्यंत वेगाने उमटले आणि सोलापुरात आल्यानंतर खुद्द सदाभाऊंनाच ते अनुभवावे लागले.

खोत यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत प्रत्येकाला जशास तसे उत्तर देण्याची तयारी सोलापूरच्या राष्ट्रवादीने आत्तापर्यंत ठेवली आहे. त्यामुळे सोलापुरात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना टाळ-मृदंगाचा गजर ऐकवला आणि काही वर्षांपूर्वी सोलापूरचे प्रेम अनुभवणाऱ्या खोतांना सोलापुरी हिसकादेखील पाहावा लागला. त्यामुळे मी कशाचे समर्थन केले आणि कशाचे समर्थन केले नाही, यााबाबत सांगत आमदार खोत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

सदाभाऊ खोत आणि सोलापूर जिल्ह्याचे नाते तसं जुनंच आहे. माढ्यातून राष्ट्रवादीच्या विरोधात लढणाऱ्यांना मते मिळत नव्हती, त्यावेळी सदाभाऊंनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना घाईला आणले होते. त्यावेळी सोलापूरकरांनी मतदानाबरोबरच नोटेचेही दान सदाभाऊंच्या पदरात भरभरून टाकले होते. माढ्याची सदाभाऊ खोत यांची खासदारकी २०१४ काठावर हुकली होती. त्यानंतर भाजपने त्यांना मंत्रिमंडळात घेत त्या लढतीची बक्षिसी दिली होती. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाचा फारसा फायदा सोलापूर जिल्ह्याला होऊ शकला नाही. आपल्या समर्थकांना स्वाभिमानीत असताना पदे देताना अडचणी येत होत्या. मात्र, रयत क्रांती संघटना स्थापन करून सदाभाऊंनी आपल्या समर्थकांची सोय लावली आहे. तेवढाच काय तो फायदा सोलापूर जिल्ह्याला झाला आहे. मात्र, उसाच्या एफआरपीपासून अतिरिक्त ऊस तसेच उजनीच्या पाण्याचा प्रश्न असताना सदाभाऊंनी केतकी चितळे प्रकरणात का लक्ष घालावे, असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यासह त्यांच्या समर्थकांनाही पडला नसेल तर नवलच.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात २००९ च्या दरम्यान सदाभाऊ खोत यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून प्रवेश झाला.जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेला चांगली मतेही मिळाली होती. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना कडवी झुंज दिली होती. त्यानंतर भाजपच्या कोट्यातून सदाभाऊ यांना विधान परिषद मिळाल. तिची मुदत जूनमध्ये संपत आहे. ‘जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ या अभियानाच्या माध्यमातून ते पुन्हा राजकारणात विशेषतः सोलापुरात सक्रीय झाले आहेत. या अभियानाचा समारोपही त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या शुक्रवारी (ता. २० मे) टेंभुर्णीत ठेवला आहे. त्यामुळे ते पुन्हा सोलापुरात सक्रीय होत आहेत की काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT