Manohar Joshi, Anagha Joshi Sarakarnama
विशेष

Manohar Joshi : पंतांनी लग्नात स्वतःलाच दिला हुंडा !

Sachin Deshpande

Mumbai News : मनोहर जोशी हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे नेते होते. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक चढउतार पाहिले. स्वतःच्या कष्टावर विश्वास आणि मेहनत करण्याची तयारी यामुळे मनोहर जोशींचा राजकीय आणि वैयक्तिक जीवनाचा प्रवास सुखकर झाला. पण, जीवनात कष्टापासून त्यांना कोणी वाचवू शकले नाही. ते त्यांनी अगदी आनंदाने केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा परिसस्पर्श जोशी सरांना झाल्याने त्याचे सोनेच मनोहर जोशी यांनी केले. पंतांनी अगदी कष्टाने राजकीय जीवनात महत्त्वाची पदे टप्प्याटप्प्यावर उपभोगली. त्या पदांना न्याय दिला. इतकेच नाही तर बाळासाहेबांच्या आदेशाने ती पदे तत्काळ सोडली इतकी निष्ठा पंतांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी होती. आज माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. (Former Maharashtra CM Manohar Joshi Died)

अतिशय गरिबीतून वर येत मनोहर जोशी यांनी स्वतःच अस्तित्व निर्माण केले. पण, हे अस्तित्व निर्माण करण्यात त्यांना मोलाची साथ लाभली ती मुख्य म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. मनोहर जोशी यांच्या जीवनात बाळासाहेबांचा प्रवेश हा जितका महत्त्वाचा तितकाच त्यांच्या पत्नी अनघा यांचादेखील प्रवेश महत्त्वाचा असा आहे. अनघा जोशी यांनी मनोहर जोशी यांना कठीण राजकीय परिस्थितीत मोलाची साथ दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात अनघा यांच्याशी लग्न करण्याचा निर्धार मनोहर जोशी यांनी केला. पण, जोशींच्या घरच्यांनी लग्नात मुलाला हुंडा लागेल अशी अटच अनघा यांच्या परिवारासमोर ठेवली. आणि मग काय लग्न होते की नाही अशीच भीती मनोहर जोशी यांच्या समोर निर्माण झाली. मुलाला मुलगी पसंत होती. पण, घरच्या मंडळींच्या समोर जाण्याची हिंमत पंतांमध्ये नव्हती. अखेर पंतांनी शक्कल लढवली आणि त्यांनी थेट अनघा यांच्या भावाची भेट घेतली. जोशी मंडळींना हुंडा पाहिजे होता तोच पंतांनी थेट अनघा यांच्या भावाच्या हातात ठेवला आणि हे सर्व गुपित ठेवत अनघा यांच्या भावाने पंतांनी दिलेला हुंडा जोशी परिवाराला दिला आणि अखेर मनोहर जोशी यांचे लग्न झाले.

१४ मे १९६४ रोजी मनोहर जोशी यांचा अनघा यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यांचं माहेरचं नाव होतं मंगल हिगवे. त्यांचा जन्म २ जानेवारी १९४५ रोजी झाला. मनोहर जोशी यांची राजकारणातील कारकीर्द लग्नानंतरच सुरू झाली. १९६८ मध्ये ते सर्वप्रथम दादरमधून मुंबई महापालिकेत नगरसेवकपदी निवडून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यानंतर मुंबईचे महापौर, विधान परिषद, विधानसभा आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्रिपद, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा अशी त्यांची राजकीय कारकीर्द उमलत गेली. शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिली. मनोहर जोशी यांच्या पाठीमागे त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मनोहर यांना राजकीय आणि सामाजिक जीवनात मोलाची साथ दिली. मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तेव्हा कायम त्यांच्या मागे उभ्या असायच्या. 2020 मध्ये अनघा जोशी यांचे निधन झाले. आज मनोहर जोशी यांनी अंतिम श्वास घेतला. आता त्यांच्या पश्चात पुत्र उन्मेष जोशी, अस्मिता आणि नम्रता या दोन कन्या, जावई गिरीश व्यास असं मोठं कुटुंब आहे.(Former Maharashtra CM Manohar Joshi Died)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT