Sudhir Joshi & Balasaheb Thackeray
Sudhir Joshi & Balasaheb Thackeray Sarkarnama
विशेष

सुधीरभाऊ : मराठी माणसाचा बुलंद आवाज !

प्रकाश पाटील

आजकाल सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातो. निष्ठा बदलतो. सुधीरभाऊ जोशी ( Sudhir Joshi ) त्याला अपवाद होते. शिवसेनेचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला, तो शेवटपर्यंत खाली ठेवला नाही. जेव्हा शिवसेनेचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, तेव्हा भाऊंची दखल घेतल्याशिवाय तो पूर्णच होऊ शकणार नाही. ( Sudhirbhau: The loud voice of a Marathi man! )

सध्या राज्यात राजकारणाचा जो धुरळा उडाला आहे, जे आरोप-प्रत्यारोप होत आहेत, त्यात जनमानसाचा फायदा तरी काय? चिखलफेकीचे राजकारण जोरात सुरू असताना एक सरळ आणि अजातशत्रू म्हणून ज्यांची ओळख होती, ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ जोशी यांनी एक्झिट घ्यावी, याचे दु:ख वाटले. धुरळा उडविणाऱ्या शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा.

मराठी माणसाचा आधार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेत जे वजनदार नेते होते, त्यांमध्ये दत्ताजी साळवी, वामनराव महाडीक, मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, सतीश प्रधान, मधुकर सरपोतदार यांचा समावेश होता. हे सर्व नेते म्हणजे शिवसेनेच्या मुलुखमैदानी तोफा होत्या. बाळासाहेबांनंतर हे नेतेही नेहमीच मैदाने गाजवत राहिले. वातावरणनिर्मिती करण्यात त्यांचा हात कोणी धरत नसत. विशेषत: साळवी, भुजबळ, महाडीक, सरपोतदार, जोशी सर हे तसे आक्रमक भाषणासाठी प्रसिद्धच होते. मात्र, सुधीरभाऊ शिवसेनेत वेगळे नेते होते.

मुंबई ही मराठी माणसाची. महाराष्ट्रापासून मुंबईला कधीही तोडू देणार नाही, असा नारा शिवसेना नेहमीच देत राहिली. मराठी माणूस स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे. केवळ वडा-पावची गाडी लावून त्याने चरितार्थ चालवू नये, तर गरीब, सामान्य, मध्यमवर्गातील मराठी मुला-मुलींना सरकारी, तसेच खासगी उद्योगांत नोकरी मिळाली पाहिजे, मराठी पोरंपोरी उच्च पदावर अधिकारी बनली पाहिजेत, याचा ध्यास सुधीरभाऊंनी घेतला होता. त्यांनी त्यांच्या पंखांना बळ दिले. स्पर्धा परीक्षा केंद्र असेल किंवा जे शिकण्यासाठी आवश्यक आहे ते त्यांनी केले. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना दिशा देण्याचा प्रयत्न केला. कुठेही नोकरी मागताना मराठी माणसाकडे स्किल हवे, हे त्यांनी ओळखले होते. बँक, हवाईसेवा असतील किंवा मुंबईतील पंचतारांकित हॉटेले असतील; तेथे आजही मराठी माणूस दिसतो त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. मध्यमवर्गात शिवसेनेचे जाळे कोणी विणले असेल तर ते भाऊंनीच. त्यांच्यामुळे शिवसेनेला मुंबईत नेहमीच फायदा झाला, हे कदापि नाकारता येणार नाही. ते स्वभावाने मनमिळाऊ तर होतेच; पण जेथे जात, तेथे ते माणसे जोडत. त्यांच्याविषयी शिवसैनिकांना आदर होता.

भाऊ शिवसैनिक होते, नेते, मंत्री होते. मुंबईचे सर्वात तरुण महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला. मात्र, कोणत्याही पदावर काम करताना त्यांनी मराठी माणूस हा केंद्रस्थानी ठेवला. आग ओकणारं भाषण त्यांनी कधीच केलं नाही. बेगडी राजकारणापासून ते दहा कोस दूरच राहिले. नेत्यांची मर्जी सांभाळण्यासाठी आजकालचे नेते काय काय करतात हे आपण पाहतच आहोत. सतत चर्चेत राहण्यासाठी आक्रमकपणा दाखवीत राहणे, असभ्य भाषेत समाचार घेणे, हे तर नित्याचेच होऊन बसले आहे. या सर्व गोष्टी भाऊंच्या स्वभावात नव्हत्या.

शिवसेना हाच गट

1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. पुढे नारायण राणे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी मात्र विशेषत: शिवसेनेत असे म्हटले जायचे, की आज छगन भुजबळ पक्षात असते तर ते मुख्यमंत्री बनले असते. तसेच सुधीरभाऊंचाही विचार व्हायला हवा होता. शिवसेनेचा हा चेहरा असा होता, की तो सर्वमान्य होता. भाऊ कोणत्या गटातटाचे नव्हते. शिवसेना हाच त्यांचा गट होता. बाळासाहेबांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. शिवसेनेने अन्याय केला, अशी खंत त्यांनी कधी व्यक्त केली नाही. पक्ष सोडण्याचा विचार स्वप्नातही केला नाही. यातच भाऊंचे मोठेपण दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT