Dhairyashil Mane
Dhairyashil Mane Sarkarnama
विशेष

उद्धव ठाकरेंना ‘तो’ निर्णय घेणे अडचणीचे वाटले असावे; पण शिंदेंनी वाट करून दिली अन्‌..

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ‘ग्राऊंड रिॲलिटी’ काय आहे, याची माहिती घेण्यासाठी शिवसंपर्क अभियान घोषित केले होते. त्यानंतर शिवसेनेचे आम्ही सर्वच खासदार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत गेलो. तेथील शिवसैनिकांच्या भावना समजून घेतल्या. शिवसेनेच्या केडरमध्ये महाविकास आघाडीबाबत असलेली खदखद आम्ही नेतृत्वाच्या कानावर घातली. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांना निर्णय घेणे अडचणीचे वाटले असावे. पण, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक वाट करून दिली आणि त्यातून एका नव्या समीकरणाची तयारी झाली, असे इचलकरंजीचे शिवसेनेचे बंडखोर खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी सांगितले. (Uddhav Thackeray must have found it difficult to take that decision : Dhairyashil Mane)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर बंडखोर खासदार माने यांनी प्रथमच एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत आपल्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले की, आत्तापर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने सर्व शिवसैनिक एकत्र आणि एकसंघ राहून काम करत होते. मी नव्याने दोन ते तीन वर्षांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या अत्यंत जवळ गेलो. अशा परिस्थिती माझ्या संवेदना, भावना ह्या नेतृत्वाच्या पायाशी आहेत. पण ते करत असताना माझा हा प्रामाणिक प्रयत्न होता की हे कुठेतरी थांबावं. एकमेकांमधील मतभेद मिटवून एकसंघपणे शिवसेना पुढे जावी. या भावनेने मी शेवटपर्यंत काम करत गेलो.

एखाद्या माणसाला घर सोडताना जो त्रास होतो, तसाच त्रास मलाच नाही, तर सर्वच शिवसैनिकांना झाला. पण, राजकीय परिस्थिती पाहता मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझी सर्वांत पहिली बांधिलकी ही माझ्या जनतेशी आहे. मी त्या वेळी नक्कीच शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो. पण त्या वेळी शिवसेना-भाजप एकसंघपणे मला ताकद देण्यासाठी होते. त्यावेळी आम्ही प्रवाहाबरोबर राहिलो. काँग्रेस-शिवसेनेची युती ही अनैसर्गिक होती, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कालच केले आहे, ते आम्हा सर्व शिवसैनिकांचे म्हणणे होते, असा दावाही माने यांनी केला.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, आम्ही टाकलेले पाऊल त्याला गद्दारी कशी म्हणता येईल. माझ्याविरोधात ज्या जिल्हाप्रमुखांनी आमच्या घरावर मोर्चा काढला, त्यांनी माझ्यासाठी निवडणुकीत मोठे कष्ट घेतले आहेत, हे मला मान्य आहे. पण, त्यांनासुद्धा ‘गोकुळ’ दूध संघाच्या संचालक पदापासून कुणामुळे लांब राहावं लागलं. प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात ही खंत आहे. त्यावेळी ते ‘गोकुळ’वर कोणाच्या विरोधात मोर्चा घेऊन गेले होते. कुणाच्या विरोधात त्यावेळी त्यांनी घोषणबाजी केली होती. तीच खदखद शिवसैनिकांच्या मनामध्ये होती, ती एकनाथ शिंदे यांनी बाहेर काढली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT