Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
विशेष

पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदार भाग्यवान आहेत...मी विदर्भात तीन कारखाने काढले अन्‌...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : तुम्ही सगळे नशीबवान आहात, कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने काढले. पण मी विदर्भात तीन कारखाने चालवतो. या वर्षी थोडे नफ्यात आले आहेत. पण, मला कसा खडतर प्रवास करावा लागला, हे सर्वांना माहिती आहे. मागच्या जन्मी पाप केलेला माणूस दोन गोष्टी हमखास करतो. तो एक तर साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र काढतो, अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील साखर कारखानदारीच्या सद्यस्थितीबाबत भाष्य केले. (Union Minister Nitin Gadkari's Commentary on Sugar Industry in the State)

महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारे वैकुंठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी, प्रा. धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्राचे राज्य सहकारी बॅंकेच्या कार्यालयात अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात चांगली परिस्थिती आहे. आता आमच्याकडेही परिस्थिती सुधारत आहे. पण आमच्याकडे तंत्रज्ञानाचे काम होत नाही. पश्चिम महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात विशेषतः पुण्यात रिक्षा ह्या शंभर टक्क्यावर इथेनॉलवर चालण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे करावी. इथेनॉल शेतकऱ्याचे आहे, त्याचा फायदा त्यांना होईल.

पुण्यात तीन इथेनॉलचे पंप सुरू करण्यात आले आहेत. इथेनॉल हे शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या उसापासून बनते आहे, त्यामुळे कारखान्यांना पर्यायाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. इथेनॉलचा वापर वाढला, तरच तुम्हाला पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलनही करावं लागणार नाही. साखरेचे भविष्य चांगले नाही. ब्राझीलमध्ये अडचण आली तरच भारतात चांगली परिस्थिती राहील; अन्यथा ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले आपले काही खरे नाही.

मला वाटतं सहकार क्षेत्र हे काळानुरुप बदलायला हवे. टेक्नॉलॉजीचादेखील वापर व्हायला हवा. काळाच्या ओघात स्वतःला बदलले, तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो. राज्यातल्या सहकार चळवळीचे मूल्यमापन करायचे असेल तर ग्रामीण भागातील जनतेवर काय परिणाम झाला, याचे मापन केले तर याचे आपण महत्व समजू शकतो. आपल्या देशातील कृषी क्षेत्राचा ग्रोथ रेट कमी आहे, तीच देशापुढील खरी शोकांतिका आहे. देशाच्या ग्रोथमध्ये जे उद्दिष्ट गाठायला हवे, ते त्याचमुळे गाठता येत नाही. पण, सहकार क्षेत्रामुळे ग्रोथ रेट वाढू शकतो, आज कोल्हापूरमध्ये सहकारी साखर कारखाने असल्याने तिथे ग्रोथ रेट चांगला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT