Sharad Pawar-led Vasantdada Sugar Institute in Pune faces government inquiry after 36 years of leadership. Sarkarnama
विशेष

VSI Pune : शरद पवार 36 वर्षांपासून अध्यक्ष; आता चौकशी लागलीय : ऊस उत्पादनात क्रांती घडवणाऱ्या VSI ची स्थापना कशी झाली?

VSI Pune : शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ऊस संशोधन आणि साखर उद्योग क्षेत्रातील महत्त्वाची संस्था म्हणून ती चर्चेत आली आहे.

Hrishikesh Nalagune

Vasantdada Sugar Institute : ऊस उत्पादनात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या गाळप हंगाम बैठकीत राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मागील 36 वर्षांपासून या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हे चौकशी प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.

पण याचमुळे वसंतदादा शुगर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटही चर्चेत आले आहे. हे इन्स्टिट्यूट नेमके काय आहे? याची स्थापना कशी झाली? हे काम काय करते? याबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र स्वतः शरद पवार यांनी एकदा या संस्थेबद्दल आणि या संस्थेची स्थापना कशी झाली, हा प्रवास उलगडला आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यात सकाळ माध्यम समुहातर्फे आयोजित दोन दिवसीय सहकार महापरिषदेच्या उद्घाटनावेळी पवार यांनी याबाबत माहिती दिली होती.

काय म्हणाले होते शरद पवार? वाचा सविस्तर

''महाराष्ट्र साखर उद्योगाची मुहुर्तमेढ ही खऱ्या अर्थाने खाजगी क्षेत्रातील लोकांनी केली. या सर्व खाजगी भांडवलदारांनी धाडस केलं, गुंतवणूक केली. जमीनी खंडाने घेतल्या, ऊस लावला आणि एक महत्त्वाचं पीक घेण्यास सुरुवात केली. १९४८ साली भारत सरकारने एक नवे औद्योगिक धोरण जाहीर केलं. या नव्या धोरणात सहकार तत्त्वाला महत्व देऊन शेतीमालावर आधारित उद्योग कोण सुरु करत असेल, तर त्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली.

हाच विचार डॉ. धनंजय गाडगीळ, पद्मश्री विखे पाटील यांनी स्विकारला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठभाई मेहता यांच्या मुंबई सहकारी बँकेच्या सहकार्याने पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. १९५०-५१ मध्ये विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ आदींच्या सहकार्याने लोणी येथे या कारखान्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात एका नव्या क्षेत्राची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी नवे कारखाने उभे राहु लागले.

माझे वडील एका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सदस्य होते. ही सगळी मंडळी एका जीपमध्ये बसून गावोगावी जाऊन भागभांडवल गोळा करण्यासाठी लोकांकडे आग्रह करत होते. त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी फलटणच्या दिवंगत मालोजीराजे नाईक निंबाळकर, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि या सगळ्या कामाला मदत करणारे गृहस्थ यांची मदत घ्यायची आणि त्यातून ही कारखानीदारी उभी करायची. हे सूत्र त्या लोकांनी स्वीकारलं. सुदैवाने त्यांना त्यात यशही प्राप्त झालं.

अतिशय काटकसरीने त्यांनी या कारखान्यांची उभारणी या लोकांनी केली. गेस्टहाऊस नावाची कल्पना सुद्धा नव्हती. बॅंकेच्या कारख्यान्याच्या बैठकीला जायचं म्हणजे सोबत दशम्या घेऊनच निघायचं. अशी पद्धत असलेलं हे नेतृत्व त्याकाळी होतं. सुदैवाने त्या काळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राला मोठा प्रतिसाद दिला. त्यांनी साखर कारखानदारीला मदत तर केली, पण प्रत्येक, गाव, तालुका जिल्ह्यातही या सहकारी संस्था कशा उभ्या राहतील, मग त्या दुधाच्या असतील, कृषी बाजार समित्या असतील, खरेदी-विक्री संघ असतील. जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, राज्य सहकारी संस्था असतील, या सर्व संस्थाच्या मागे उभे राहण्याची आणि सरकारची शक्ती उभी करण्याची भूमिका त्यावेळच्या नेतृत्त्वाने घेतली.

नंतर राज्यात कमाल जमीन कायदा लागू झाला. त्यानंतर खासगी कारखानदारांकडे शेकडो ते हजार एकर जमीनी ज्या पडून होत्या. त्या जमीनी सरकारने काढून घेतल्या. शेतमालांसाठी स्वतंत्र संस्था केली. त्याचा कारखान्यांच्या वाढीवर विपरित परिणाम झाला, हे आपल्याला मान्य कराव लागेल. पण याचा दुसरा फायदा झाला. या काळात खासगी कारखानदारीपेक्षा लहान शेतकऱ्यांनी भागभांडवल जमा करुन सहकारी कारखानदारी उभी करावी ही भूमिका घेण्यात आली. या भूमिकेतून महाराष्ट्रात सहकारी कारखान्यांचं जाळं उभ राहिलं.

वसंतदादा पाटील कमी शिकलेले पण दुरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी या सहकारी चळवळीला प्रभावी नेतृत्व दिलं. वसंतदादा यांनी त्यांच्या काळात कारखानदारी वाढावी म्हणून शुगर कमिशन म्हणजेच साखर संचलनालयाची स्थापना केली. अजित निंबाळकर यांची या संचलनालयाचे पहिले डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली. या सगळ्या कामाला गती देण्याचं काम या सगळ्याच्या मदतीने झालं. एका बाजून कारखानदारी वाढायला लागली, पण दुसरीकडे कारखान्यात काम करणाऱ्याची आणि इतर घटकांची कमतरता भासू लागली. अनेक गोष्टींची कमतरता भासू लागली. ही कमतरता दूर करण्यासाठी चर्चा झाली.

याच काळात कानपूरमध्ये उस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था केंद्र सरकारने सुरु केली होती. तशी संस्था महाराष्ट्रात का काढू नये हा विचार आला. यानंतर वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील, तात्यासाहेब हुले, रत्नाप्पा कुंभार, यशवंतराव मोहिते या जाणकारांनी कानपूरच्या धर्तीवर डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. वसंतदादांनी ही सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण १९८९ मध्ये दादांच्या निधनानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आली. तेव्हापासून मी या संस्थेचा अध्यक्ष आहे.

मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतला. डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच नाव बदलून वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट असं नामकरण केलं. मी आनंदाने सांगतो की, ही संस्था जागतिक स्तरावर संशोधन सेवा आणि सल्ला या बाबतीत मदत करणारी एक महत्त्वाची संस्था आहे. आज या संस्थेत भारताबाहेरील संस्थाकडून टेक्निकल सपोर्ट करण्यासंबंधीचे प्रस्ताव येत असतात. हे काम तिथे केलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT