Amit Shah-Narendra Modi-Eknath Shinde
Amit Shah-Narendra Modi-Eknath Shinde Sarkarnama
विशेष

शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? मोदी-शहांनी एकनाथ शिंदेंना दिले हे उत्तर...

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : मातोश्रीवरील बैठकीत शिवसेनेला (Shivsena) अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद (Chief Minister) देण्याचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्याच मुद्यावर शिवसेनेने भाजपशी (BJP) काडीमोड घेत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जात राज्यात सत्ता स्थापन केली. दिल्ली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शब्दासंदर्भात शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विचारले. त्याबाबत त्यांनी ‘आम्ही शब्द दिला असता, तर तो का फिरवला असता,’ असे उत्तर दिल्याचे शिंदे यांनी स्पष्ट करत एक प्रकारे शिवसेनेला तसा शब्द दिला नसल्याचे सूचित केले. (Was Shiv Sena given promise of Chief Ministership? Modi-Shah gave this answer to Eknath Shinde...)

ठाणे येथे १७५ संस्थांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. त्याच कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीदरम्यान शिंदे यांनी या मुख्यमंत्रीपदाच्या वादाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता का? याबाबत मी स्वतः केंद्रीय गृहमंत्री शहा यांना विचारलं. फक्त शहा यांनाच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही या संदर्भात बोललो. पंतप्रधानांनी मला सव्वा ते दीड तास दिला होता. चर्चेदरम्यान त्यांना मी याबाबत विचारले, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, बिहारमध्ये नीतिशकुमार यांचे आमदार कमी असताना त्यांना मुख्यमंत्री बनवू शकतो, तुमचे ५० आमदार (बंडखोर) आणि आमचे १०६ आमदार असताना तुम्हाला मुख्यमंत्रिपद देऊ शकतो, तर मग आम्ही शब्द दिला असता तर तो का फिरवला असता? असं त्यांनी मला त्या भेटीत सांगितले. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही माझ्यासोबत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या वेळी मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव होते की नाही, हे मला माहिती नाही. पण, पातळी सोडून टीका करण्याचा बोलण्याचा माझा स्वभाव नाही, त्यामुळे ज्यांनी त्यांनी विचार करावा की, हा निर्णय आम्ही का घेतला. गेल्या अडीच वर्षांत माझ्या सहकाऱ्यांनी जे भोगले, सोसलं. त्याबाबत सांगण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला यश आले नाही, अशी कबुलीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांपूवी मुख्यमंत्रिपद स्वीकारून चूक केली का? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ते मी बोलू शकत नाही. चूक की बरोबर हे ज्याचं त्यांनी ठरवावं.

मुंबईहून ठाण्याला यायला निघाले, तेव्हा वाटलं की अर्ध्या तासात पोहोचेन. मात्र, रस्त्यात स्वागतासाठी प्रचंड गर्दी होती. त्यांना टाळून येऊ शकत नव्हतो, त्यामुळे या ठिकाणी यायला उशीर झाला. त्यावरून आपण नकीच ठरवू शकता की आम्ही जे काही पाऊल उचललं आहे. त्याला जनतेचा पाठिंबा आहे. तसेच, राजकारणाशी कोणताही संबंध नसलेल्या १७५ संस्थांनी हा सत्कार आयोजित केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची आम्हाला अन्यायाविरोधात लढण्याची शिकवण होती. आम्ही पूर्वी आंदोलन करून साखरेच्या गाड्या अडवायाचो, त्यातील साखर आम्ही लोकांना वाटायचो. सत्ता सोडून ५० आमदार विरोधात जातात, हे संबंधितांनी लक्षात घेतले पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT