Mohit Kamboj, Gopichand Padalkar, Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : अजितदादांना आणखी काय हवंय? कारवाया थांबल्या, सत्ताही भेटली; आता ते सहन करावंच लागणार

Datta Deshmukh

Beed : मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांमध्ये ते पद सांभाळण्याची क्षमताही आहे. त्यांनी आपलं राजकीय तत्त्व आणि विचारसणीला १८० अंशांच्या कोनात वळवून सत्तेत एन्ट्री केली. ती एन्ट्री या पदामुळे की त्यांच्यासह समर्थकांच्या संस्थांवरील कारवाई टाळण्यासाठी याचे गुपित पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच माहिती. प्रथमदर्शनी तरी त्यांच्या व समर्थकांभोवतालच्या कारवाया थांबल्या आणि सत्तेतली प्रमुख खुर्चीही भेटली. त्यामुळे त्यांच्याबाबत आज तरी ‘आणखी काय हवंय’ असंच म्हणावं लागेल. (What else does Ajit Pawar want?)

मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मोहित कंबोज यांच्याकडून शेलक्या शब्दांत होणारे वार आणि शालजोडे याबाबत आता सहन करण्याशिवाय त्यांना पर्याय तरी काय, अशी परिस्थिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिस्तीतले व राजकीय गट्स असलेले राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. मुख्यमंत्रिदावर बसणे, ही त्यांची केवळ मनीषाच नाही, तर हे पद सांभाळण्याची त्यांच्यात क्षमताही आहे, हे नाकारून चालणार नाही. त्यांनी आतापर्यंत जलसंधारण, वित्त, ऊर्जा अशी एक ना अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. प्रशासनावर वचक आणि कार्यकर्ते तसेच पक्षातील नेत्यांवर जरब असणारे नेते, अशी अजित पवार यांची ख्याती आहे.

विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील त्यांनी या सरकारवर चांगलीच जरब ठेवली होती. राज्यातील महायुती आणि केंद्रातील भाजप सरकारवरच्या धोरणांवर ते सत्तेत सहभागाच्या आदल्या दिवशीपर्यंत जोरदार आसूड ओढत. मग तरुणांचे रोजगार व नोकऱ्या, अल्पसंख्याक समाजावरील अन्याय, कांद्याचा प्रश्न, शेतीमालाला हमीभाव, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सत्तांतरावेळी ५० खोके आदी विविध मुद्दे घेत अजित पवार राज्यातील तत्कालीन शिंदे-फडणवीस सरकारसह मोदींवरही जोरदार टीकास्त्र सोडत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे भले करू शकतात, हा साक्षात्कार इतरांप्रमाणे अजित पवारांनाही एके दिवशी झाला. आता या साक्षात्कारामागची कारणे काय, याबाबत राजकीय जाणकारांमध्ये विविध मते आहेत. अजित पवार व त्यांच्या नातेवाइकांच्या संबंधित काही साखर कारखान्यांची केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेली चौकशी, त्यांच्यावर राज्यातील भाजपने केलेले जलसिंचन प्रकल्पातील अनियमिततेचे आरोप, भाजपकडूनच राज्य सहकारी बँकेतील आर्थिक अनियमिततेचे आरोप व याबाबतच्या चौकशांसह त्यांचे सहकारी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही केंद्रीय यंत्रणांची वक्रदृष्टी टाळण्यासाठी अजित पवारांनी सत्तेत एन्ट्री केली की भविष्यात मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून केली हे सांगता येणार नाही.

पहिल्या डावात तरी त्यांना व त्यांच्या इतर आठ सहकाऱ्यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचे मुकुट तर चढले. तसेच चौकशांचा फेराही थांबून आता ‘क्लीन चिट’ची शृंखलाही सुरू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद भेटले तर ते त्यांच्यासाठी बंपर बोनस म्हणावा लागेल. मात्र, आता अजित पवारांना मुख्यमंत्रिपद भेटणार असे आडाखे त्यांच्या समर्थकांकडून बांधले जात असतानाच आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पवारांवर झालेली असंविधानिक टीका असेल किंवा मोहित कंबोज यांच्याकडून शेलक्या शब्दांतील वॉर (मुख्यमंत्री होण्यासाठी ४५ नाही, तर १४५ आमदार लागतात हे ट्विट करून नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले) होणे हे चुकून नाही तर प्लॅन्ड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

विशेष म्हणजे पडळकर आणि कंबोज हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ‘खासमखास’ मानले जातात. पवारांच्या फाइलही फडणवीस तपासत आहेत. पवार समर्थक मंत्र्यांना संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद देण्याबाबतही दोन महिन्यांपासून घोळ सुरू आहे. मात्र, चौकशा थांबल्या आणि सत्ताही भेटल्याने आता त्यांना या बाबी सहन तर कराव्याच लागणार. आता एवढ्यावर जर त्यांना मुख्यमंत्रिपद भेटले तर त्यांच्यासाठी व राष्ट्रवादीसाठी ‘बंपर लॉटरी’च म्हणावी लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT