Amit Shah
Amit Shah File Photo
विश्लेषण

अमित शहांची खेळी : निवडणुकीआधीच काँग्रेसच्या अर्ध्या राज्यावर मिळवला ताबा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढवले आहे. यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची खेळी असल्याची चर्चा आहे. बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवल्याने जवळपास निम्मा पंजाब (Punjab) अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारच्या ताब्यात आला आहे. काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आलेल्या असताना काँग्रेसच्या ताब्यातील निम्मे राज्यच शहांनी ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत सीमा सुरक्षा, जम्मू व काश्मीर आदी मुद्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा निर्णयही महत्वाचा मानला जात आहे. बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. या भागात तपास करणे, संशयितांना अटक करणे, जप्ती करणे असे अधिकार मिळाले आहे. पंजाब, पश्चिम बंगाल व आसाममध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र केवळ 15 किलोमीटर होते. आता सुधारित आदेशानुसार हे क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बीएसएफला तपासणी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.

बीएसएफला यापूर्वी पंजाबमध्ये केवळ 15 किलोमीटरपर्यंत अधिकारक्षेत्र होते. आता हे क्षेत्र 35 किलोमीटरने वाढवून ते 50 किलोमीटर करण्यात आले आहे. पंजाबचे क्षेत्रफळ सुमारे 50 हजार चौरस किलोमीटर आहे. आता बीएसएफच्या ताब्यात निम्मे राज्य म्हणजे 25 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गेला आहे. याला काँग्रेसने विरोध केला असून, संघराज्य रचनेवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. यावरुन केंद्र सरकावर टीकेची झोड उठवली जात आहे. राज्यांच्या स्वायत्ततेवरच केंद्रातील भाजप सरकार घाला घालत आहे, अशीही टीका केली जात आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून कॅप्टन अमरिंदरसिंग यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन एकाच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने बीएसएफचे अधिकारक्षेत्र वाढवल्यानंतर या निर्णयाचे स्वागत करण्यात कॅप्टन अमरिंदरसिंग आघाडीवर होते. पंजाबमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये विधानसभा निवडणुका होणे अपेक्षित आहे. यातच अमित शहांनी ही खेळी खेळून निवडणुकीआधीच निम्मा पंजाब केंद्र सरकारच्या ताब्यात घेतला आहे.

यावरुन पंजाब काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना लक्ष्य केले आहे. कारण काही दिवसांपूर्वीच चन्नी यांनी अमित शहांची भेट घेतली होती. त्यानंतर आठवडाभरातच हा निर्णय झाल्याने जाखड यांनी चन्नी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा वाद सुरू झाल्यानंतर चन्नी हे काल (ता.14) थेट कॅप्टन अमरिंदरसिंगांच्या घरी पोचले होते. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्यास चन्नी यांचा विरोध आहे. परंतु, कॅप्टन यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. असे असतानाही चन्नी हे कॅप्टन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते. आता काँग्रेस शहांच्या खेळीला कशा प्रकारे उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT