alliance with bjp to continue says aiadmk leader o paneerselvam
alliance with bjp to continue says aiadmk leader o paneerselvam 
विश्लेषण

अमित शहांचे पाऊल पडताच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांना आठवली आघाडी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाने आता तमिळनाडूकडे लक्ष वळविले आहे. तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाचे मुख्य समन्वयक व उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी आगामी निवडणुकीत भाजपशी आघाडी कायम राहील, अशी जाहीर घोषणा केली. त्यामुळे मागील काही काळ अण्णाद्रमुक सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादावर पडदा पडल्याचे मानले जात आहे. 

शहा यांच्या तमिळनाडू दौऱ्यामुळे सर्वच प्रादेशिक पक्ष सावध भूमिका घेत आहेत. विकास योजनांच्या उद्गाटनासाठी असलेल्या दौऱ्याची माहिती देताना स्वतः शहा यांनी, संघटनात्मक कामासाठी आपण चेन्नईला पोहोचलो असे ट्‌विटरवर जाहीर केले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे भाजपशी चांगले संबंध होते.  मात्र, मागील काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. केवळ नाईलाजाने अण्णाद्रमुक पक्ष केंद्रात भाजपबरोबर असल्याचे चित्र आहे. 

भाजपच्या वेल यात्रेवरून अण्णाद्रमुकच्या नेत्यांतील मतभेद समोर आले होते. ओ. पनीरसेल्वम यांच्या बंडखोरीमागे भाजपचे केंद्रीय नेतृत्व असल्याचे त्यावेळी समोर आले होते. भाजपच्या वेल यात्रेला दोन्ही द्रविडी पक्षांचा तीव्र विरोध आहे. कोरोनाचे निमित्त करून अण्णाद्रमुक सरकारने यात्रेवर बंदी घालून अनेक भाजप नेत्यांना अटक केली होती. तरीही भाजपने यात्रा पुढे रेटली असून, 6 डिसेंबरला या यात्रेच्या समारोपानिमित्त मोठा मेळावा घेण्याची भाजपची तयारी आहे. शहा आजच्या तमिळनाडू दौऱ्यात यासंदर्भातही चाचपणी करणार आहेत. 

शहांचे स्वागत मुख्यमंत्री के.पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम, वरिष्ठ मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष एल. मुरूगन यांनी केले. या वेळी शहांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात पनीरसेल्वम यांनी भाजपसोबत आघाडी कायम राहील, अशी जाहीर घोषणा केली. या वेळी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनीही हीच भूमिका घेतली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत असलेली आघाडी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील. आम्ही दहा वर्षांत चांगले सरकार दिले आहे. विधानसभेच्या 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीतही आमची आघाडी असेल.  

शहा हे या दौऱ्यात माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांचे पुत्र एम. अळगिरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकमध्ये अळगिरी यांना अडगळीत टाकण्यात आले आहे. ते लवकरच द्रमुक के (कलैग्नार) या नव्या पक्षाची स्थापना करणार आहेत. त्यांच्या या पक्षाशी युती करण्याच्या दृष्टीने शहा-अळगिरींबरोबर चर्चा करतील, असे सांगण्यात येते.  

अळगिरी यांच्याशी युती झाली तर भाजपला त्याचा कितपत फायदा होईल, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, द्रमुकला याचा नक्कीच फटका बसेल. द्रमुकला फटका बसल्यास याचा थेट फायदा अण्णाद्रमुकला होईल. याचबरोबर भाजपच्याही मतटक्‍क्‍यातही काहीशी वाढ होऊ शकेल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT