भाजपने संघटनात्मक फेरबदल करून अमित साटम यांना मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
बीएमसी निवडणूक, नवमतदारांशी संपर्क, स्थानिक प्रश्न सोडविणे आणि अंतर्गत गटबाजी टाळणे ही त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हानं आहेत.
मुंबईतील शिवसेना बालेकिल्ला मोडून भाजपला महापालिकेत सत्ता मिळवून देणं हे त्यांचं मुख्य ध्येय आहे.
निवडणूक आयोगाने महापालिका प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपने राज्यात संघटनात्मक फेरबदल केले. यात प्रमुख बदल म्हणजे मुंबईतील ज्येष्ठ आमदार अमित साटम यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली. शहरातील विविध प्रश्नांवर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे आमदार म्हणून अमित साटम यांची ओळख आहे. मुंबई महापालिकेच्या 'कारभारा'वर जोरदार टीका करणारे साटम हे मुंबईतील भाजपचे प्रमुख नेते आहेत.
त्यांच्या नियुक्तीने पक्षाला नवी उभारी आली आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात कशी घ्यायची? यांची रणनीती पक्षश्रेष्ठी आखत आहेत.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. स्थानिक स्वराज सनिवडणुकीच्या रणधुमाळीची तयारी करत पालिकेने प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमित साटम यांच्यासमोर अनेक मोठी आव्हानं असली तरी त्यांच्याकडे असलेली कार्यक्षमता, संघटन कौशल्य यावर ते मुंबई भाजपाला योग्य त्या उंचीवर नेऊ शकतील, असा विश्वास आहे.
४९ वर्षीय अमीत साटम अंधेरी पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. नागरी प्रश्नांवर आक्रमक भूमिका आणि महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका करणारे साटम हे मुंबईतील पक्षाचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले आहेत. विधानसभेवर निवडून येण्यापूर्वी साटम यांनी नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात ते दीर्घकाळ सक्रीय आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. मुंबईतील 227 पैकी सुमारे 200 वॉर्ड मध्ये भाजपची स्थिती बळकट करण्यासाठी वॉर्ड पातळीवर
कार्यकर्त्यांना ताकद देणे, बूथ व्यवस्थापनाचे नियोजन करणे, मतदारांशी घरापर्यंत पोहचून त्याच्याशी संवाद साधणं आदी काम साटम याच्यासमोर आहे,
महिला वर्ग, युवा वर्ग, अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचणं ही देखील एक महत्वाचे काम त्यांच्यासमोर आहे. यासाठी हायटेक प्रचारतंत्र, सोशल मीडियाचा प्रभावी वापर,करणे गरजेचे आहे. अमित साटम हे तंत्रस्नेही आहेत. त्यामुळे हे काम त्यांच्यासाठी अवघड नाही.
मुंबईतील वाहतूक कोंडी, कचरा, पाणी प्रश्न, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन याकडे त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आतापर्यंत महापालिका सत्ताधारी यांच्याविरोधात स्थानिक प्रश्नावर आवाज उठवणारे साटम आता प्रत्यक्षात हे प्रश्न कसे सोडविणार याकडे सगळ्याचे लक्ष असेल.
मुंबईतील भाजपमध्ये अनेक वरिष्ठ आणि महत्त्वाकांक्षी नेते आहेत. या नेत्यांमध्ये समन्वय साधून संघटनेला एकसंघ ठेवण्याचं मोठं आव्हान अमित साटम यांच्यासमोर आहे. कोणतीही अंतर्गत फूट उघड होऊ न देता, संघटनेचं बळ वाढवणं हे त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांना मानणारा बहुसंख्य मतदार मुंबईत आहे. त्यामुळे येथे भाजपाची महापालिका निवडणुकीत जोर लावाला लागणार आहे.
Q1. अमित साटम कोण आहेत?
अमित साटम हे अंधेरी पश्चिमचे तीन वेळा आमदार आणि मुंबई भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत.
Q2. त्यांच्यासमोरील मोठं आव्हान कोणतं आहे?
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून देणं हे सर्वात मोठं आव्हान आहे.
Q3. स्थानिक पातळीवर त्यांना कोणत्या प्रश्नांना सामोरं जावं लागेल?
वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांसारख्या प्रश्नांना.
Q4. भाजपसाठी मुंबई महापालिका का महत्वाची आहे?
कारण मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असून तिच्यावर नियंत्रण मिळवणे हे मोठं राजकीय व आर्थिक बळ ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.