Eknath shinde - Amit shah
Eknath shinde - Amit shah sarkarnama
विश्लेषण

त्या गुप्त भेटीत अमित शहांनी शिंदेंना स्पष्टच सांगितले! मलईदार खात्यांसाठी जास्त...

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde- Fadnavis Govt) सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी आता गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीच आता सूत्रे हाती घेतली आहेत. गृह, अर्थ, सार्वजनिक बांधकाम यासह काही ‘महत्वपूर्ण' विभागांबाबत त्यांनी एकनाथ शिंदेना स्पष्ट शब्दांत सांगितल्याची चर्चा आहे. ही महत्वाची मंत्रालये भाजपकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. सारी महत्वाची खाती बंडखोरांना दिली तर भाजपच्या 115 आमदारांनी काय करायचे, असा सवाल शहांनी शिंदेंना केल्याचे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कानोकान खबर लागू न देता नुकतेच पुन्हा एका रात्री दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर खलबते करून गेल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे यांचा दौरा ‘कागदावर' कोठेही येऊ नये याची काटेकोर काळजीही भाजप नेतृत्वाने घेतली.

उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे यांना साथ देणाया ४० अधिक अपक्ष १० या आमदारांपैकी बहुतेक जणांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागल्याने विस्ताराचे गाडे अडले. त्यातच शिंदे गटाने काही मलईदार खात्यांची मागणी लावून धरली होती. ही खाती भाजपकडेच रहायला हवीत असे फडणवीस यांनी शहा यांच्याकडे स्पष्ट केले होते. त्यानुसार महत्वाची मंत्रिपदे तुमच्याकडे देता येणार नाहीत. पण त्यातील राज्यमंत्रीपदी शिंदे गटातील आमदारांची वर्णी लागू शकते. तथापि त्यासाठीही पडणवीस यांचा होकार आवश्यक असेल असे शहा यांनी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केले. सर्वच महत्वाची मंत्रालये शिंदे गटाकडे दिल्यावर आपल्या ११५ आमदारंना काय द्यायचे, असा तार्किक मुद्दा फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे मांडल्याचे समजते.

मुख्यमंत्री शिंदे २७ जुलै रोजी (बुधवारी) दिल्लीत येणार होते. मुख्यमंत्री झाल्यापासून जेमतेम २५ दिवसांत त्यांचा हा सहावा दिल्ली दौरा होता. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचे सर्वोच्च नेतृत्व (जे पी नड्डा नव्हे) शिंदे यांना वारंवार दिल्लीत का बोलावत आहे, याबाबतच्या चर्चा पीएमओपर्यंत जाताच तेथून काही सूचना गेल्या व २७ तारखेला मध्यरात्री शिंदे यांनीच (शहा यांना भेटण्यास) दिल्लीत यावे असे कळविण्यात आल्याचे कळते. मात्र रात्रीच्या अंधारातील हा गुप्त दौरा अधिकृत न ठेवल्याने महाराष्ट्र सदनातील अधिकारी याबाबत काही बोलत नाहीत. शिवसेनेतील एका खासदाराने मात्र ‘त्यांचे मुख्यमंत्री दिल्लीत आले होते,‘ असे खात्रीपूर्वक सांगितले.

रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री दिल्ली विमानतळावर तरतील व रात्री साडेअकराला त्यांचे परतीचे विमान आहे असे कळविण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारच्या दिल्लीतील विभागाने तयारी केली. नवीन महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचे दालन उघडून साफसफाई करण्यात आली. तेथे सुकामेवा काही फळे व राज्य शासनाच्या राजशिष्टाचारानुसार अन्य आवश्यक साहित्य ठेवण्यांत आले. रात्री पावणेआठच्य सुमारास मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द जाल्याची माहिती दिल्लीतील प्रसासनास समजली. निवासी आयुक्तांनी मुख्यमंत्री दालन बंद करून घेण्यास सांगितले व ‘डबल ड्यूटी‘साठी थांबवून ठेवण्यात आलेल्या कर्मचाऱयांनाही घरी सोडण्यात आले. मात्र त्याच दिवशी रात्री साडेअकराच्या सुमारास मुख्यमंत्री दिल्ली विमानतळावर उतरले. राजशिष्टाचार न घेताच ल्यूटियन्स दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात विश्रांतीसाठी थांबले व काही मिनिटांत शहा यांच्याकडे रवाना झाले अशीही माहिती सूत्रांनी दिली. तेथून त्यांना भाजपच्या व्यवस्थेनेच उत्तररात्री पुन्हा विमानतळावर सोडले व मुख्यमंत्र्यांच्या याच दौऱयात शहा यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्याचे कळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT