Amrishbhai Patel
Amrishbhai Patel Sarkarnama
विश्लेषण

हुश्‍श...अमरिशभाई बिनविरोध अन्‌ निवडणूक यंत्रणेचा सुस्कारा...!

Sampat Devgire

धुळे : विधान परिषदेची मतदान प्रक्रिया काहीशी किचकट असल्याने निवडणुक बिनविरोध होऊन दिलासा मिळावा यासाठी निवडणूक यंत्रणा प्रार्थना करत होती. ती शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास फळाला आली. विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने धुळे- नंदुरबार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार अमरिशभाई पटेल (Amrishbhai Patel) तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे हुश्‍श...म्हणत स्थानिक निवडणूक यंत्रणेने सुस्कारा टाकला.

महाविकास आघाडीचे नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार गौरव वाणी, काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, शिवसेनेचे नंदुरबार येथील नगरसेवक दीपक दिघे आणि भाजपचे शिरपूर येथील उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार आमदार अमरिशभाई पटेल बिनविरोध निवडून आले. त्यांचे वरिष्ठ व स्थानिक पातळीवर सर्व पक्षीयांशी असलेले घनिष्ठ संबंध आणि नुकत्याच झालेल्या धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा विरोध वगळता भाजपचे नेते अमरिशभाई यांनाच सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख करण्यात आले होते. यावरून त्यांना विधान परिषदेची निवडणूक सोपी होती हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

या मतदारसंघासाठी भाजपतर्फे अमरीशभाईंना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. विधानसभा व विधान परिषदेच्या आखाड्यातील अजिंक्यवीर, अशी आमदार पटेल यांची प्रतिमा आहे. अमरीशभाई पटेल २००९ पासून या मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. २००९ मध्ये या मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे बिनविरोध निवडून जाण्याची किमया त्यांनी करून दाखवली. २०१५ मध्येही भाजपचे डॉ. शशिकांत वाणी यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिली. त्यात आमदार पटेल यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा पराभव केला. पोटनिवडणुकीत भाजपची सर्व मते मिळवतांनाच त्यांनी महाविकास आघाडीची मतेही मोठ्या प्रमाणात खेचली. आता सलग तिसऱ्यांदा ते उमेदवारी करीत होते. पोटनिवडणुकीतील पराभवाचे प्रचंड अंतर लक्षात घेता या निवडणुकीत मतदानाची परिस्थिती काय असेल याबाबत उत्सुकता होती.

अशी आहे राजकीय कारकिर्द...

आमदार पटेल यांनी १९८५ मध्ये शिरपूर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणाला सुरुवात केली. १२ वर्षे ते नगराध्यक्ष होते. १९९०, १९९५, १९९९ व २००४, अशा सलग चार निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे शिरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. २००३- २००४ मध्ये त्यांनी शालेय शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद भूषवले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT