विश्लेषण

अर्जुन खोतकर आता मुंबई मार्केट समितीमध्ये नशीब आजमावणार

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती व शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर आता मुंबई मार्केट कमिटीच्या संचालकपदासाठी नशीब आजमावणार आहेत. 29 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या संचालकपदाच्या निवडणुकीत औरंगाबाद महसूल विभागातून अर्जून खोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. परंतु राज्यात नव्याने महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे आता शिवसेनेला देखील संचालक मंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. अर्जुन खोतकर यांना मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आणि स्टील उद्योगाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचा दांडगा अनुभव आहे. 

तेवीस संचालक मंडळाच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 29 रोजी निवडणुक होत असल्यामुळे सगळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यातील सहा महसुली विभागातून प्रत्येकी दोन अशा बारा, सहा व्यापारी प्रतिनिधी, एक हमाल मापाडी, पाच शासनाने नामनिर्देशित केलेले, दोन महापालिकेचे प्रतिनिधी असे एकूण 23 जणांचे संचालक मंडळ निवडण्यात येणार आहे. 

अर्जुन खोतकर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा जालन्यातून पराभव झाला होता. शिवसेनेकडून त्यांच्या पुर्नवसनाची तयारी सुरू असतांनाच खोतकरांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT