Devendra Fadnavis Nitin Gadkari  sarkarnama
विश्लेषण

BJP Politics : बालेकिल्ला कोसळला, आता आव्हान देवेंद्र फडणवीस, गडकरी यांच्यासमोर

अय्यूब कादरी

BJP Politics : लोकसभा निवडणुकीतील अपयश आणि त्यापोठापाठ येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विदर्भात लोकसभेच्या 10 जागा आहेत. त्यापेकी भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या. महायुतीतील शिवसेनेला केवळ एक जागा मिळाली. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहे. विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकू, असे अमित शाह त्यामुळेच म्हणत आहेत.

देशात 2014 च्या निवडणुकीपासून मोदी लाट सुरू होती. 2019 च्या निवडणुकीतही मोदी लाटेचा प्रभाव कायम राहिला. शिवसेना आणि भाजप युतीने 2014 च्या निवडणुकीत विदर्भातील सर्व 10 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत त्यांची एक जागा कमी झाली. या दोन्ही निवडणुकांत शिवसेना अविभाजित होती. उद्धव ठाकरे हे नाव युतीत भाजपसोबत होते. 2019 नंतर परिस्थिती बदलली, शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले आणि 2024 च्या निवडणुकीत विदर्भाच्या बालेकिल्ल्यातच भाजपची मोठी पीछेहाट झाली.

तसे पाहिले तर विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला होता. भाजपला 1990 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात 42 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी 12 जागा एकट्या विदर्भाने भाजपच्या पारड्यात टाकल्या होत्या. 1995 मध्ये राज्यात भाजपला 65 जागा मिळाल्या, त्यातील 22 जागा विदर्भाने दिल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागण्यास सुरुवात झाली होती. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. विदर्भात विधानसभेलाही भाजपची कामगिरी घसरलेलीच राहिली सत्तेत परतण्याची वाट बिकट होणार आहे.

मोदी लाटेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला एकूण 122 जागा मिळाल्या होत्या आणि त्यात विदर्भाने 44 जागा दिल्या होत्या. मोदी लाट 2019 च्या निवडणुकीतही होती, तरीही भाजपची कामगिरी घसरली होती. त्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपला विधानसभा निवडणुकीत विदर्भातून 15 जागांचा फटका बसला होता. पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये सात लाखांची घट झाली होती.

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत तर चित्र एकदम उलटे झाले आहे. महाविकास आघाडीने दहापैकी सात जागा जिंकल्या आहेत. यापैकी पाच जागा मिळवत काँग्रेसने आपला बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला आहे. गडचिरोली -चिमूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि अमरावती या पाच मतदारंसंघांत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. यवतमाळ-वाशीममध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वर्धा येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले.

मताधिक्य घटल्याने चिंता

भाजपसाठी परिस्थिती तितकीशी सोपी राहिलेली नाही. राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनंगटीवार, नवनीत राणा आदी भाजपच्या महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला. जे तीन उमेदवार विजयी झाले आहेत, त्यांना मिळालेले मताधिक्यही भाजपसाठी चिंतेचे कारण ठरले आहे. नागपूर मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांना यावेळी 1 लाक 37 हजार 607 मतांची आघाडी मिळाली. 2019 च्या निवडणुकीत ते 2 लाख 16 हजार 009 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे 40 हजार 626 मतांनी विजयी झाले. बुलढाणा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रतापराव पाटील यांना केवळ 29 हजार 479 मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार 406 मतांनी पराभव केला.

अशा परिस्थितीमुळे विदर्भात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचा कस लागणार आहे. हे दोघेही भाजपला पूर्ववैभव प्राप्त करून देतील का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मोदी, शहांचे दौरे वाढले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 सप्टेंबरला वर्धा दौऱ्यावर होते. त्यापाठोपाठ अमित शाह हे 24 आणि 25 सप्टेंबर असे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी हे 5 ऑक्टोबरला पुन्हा वाशीम येथे येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत विदर्भ हा भाजपसाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे, हे यावरून लक्षात येईल.

लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न मोदी, अमित शाह करत आहेत. कार्यकर्त्यांना कामाला लावणे, मतदारांचा विश्वास पुन्हा जिंकणे ही फडणवीस आणि गडकरी यांच्यासमोरील मोठी आव्हाने आहेत. गडकरी हे राज्याच्या राजकारणात फारसे सक्रिय नसतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना राज्यात सक्रिय करण्यात आले आहे. महाराष्ट्र भाजप हा आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर चालणारा एकखांबी तंबू होता. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. बदलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात फडणवीस आणि गडकरी यांना यश येईल का, यावरही विदर्भातील भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT