Balasaheb Thorat
Balasaheb Thorat sarkarnama
विश्लेषण

काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवाराबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसच्या (congress) राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीबाबत राज्याचे महसूल मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी वक्तव्य केले आहे. राज्यसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारीबाबात आम्हाला दिल्लीत जाऊनच निर्णय प्रक्रिया करावी लागते. कारण, आमचे नेते दिल्लीत आहेत. योग्य वेळी आणि योग्य असा उमेदवार काँग्रेसकडून जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Balasaheb Thorat said about Congress Rajya Sabha candidature ....)

बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना राज्यसभा उमेदवारीबाबत वरील भाष्य केले. महसूल मंत्री म्हणाले की, आमच्या पक्षाचे नेते दिल्लीत असतात, त्यामुळे निर्णय प्रक्रियाही तेथूनच होते. उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही दिल्लीत जाणार आहोत. त्या वेळी अनेक गोष्टींची चर्चा होईल, त्यात उमेदवारांची देखील चर्चा केली जाईल. त्यानंतर योग्य वेळी योग्य असा उमेदवार जाहीर करण्यात येईल.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणावर पडलेल्या ईडीच्या छाप्याबाबत महसूल मंत्री थोरात म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा राजकारणासाठी वापरल्या जातात, हा आमचा कायमचा आरोप आहे. ती वस्तुस्थितीच आहे. सगळ्या त्रासानंतर आर्यन खानसारखं अनिल परब आणि इतर नेत्यांबाबत उत्तर येईल. पण, त्यांनी भोगलेल्या त्रासचं काय, हा प्रश्न शिल्लक राहतो.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज दगडूशेठ गणपती मंदिरात गेले नाहीत, त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले. त्याबाबत त्यांनी आपण आज मांसाहार केला असल्याने आपण बाहेरूनच दर्शन घेतल्याचे सांगितले. त्याबाबत थोरात म्हणाले की, हा शरद पवार यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आज त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं, याचा आनंद आहे. ते कायम वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत, जो संप्रदाय पांडुरंगाला मानतो.

जमीन खरेदी करताना अनेक लोकांची फसवणूक होते, त्यासाठी आता सांकेतिक क्रमांकावर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. जमिनाच्या नकाशासहित सर्व माहिती उपलब्ध झाल्यामुळे फसवणूक होणार नाही, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

संभाजीराजेंच्या पाठिंब्याबाबत मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले होते

संभाजी राजेंच्या पाठिंब्याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, महाविकास आघाडीनं संभाजी राजे यांना समर्थन द्यावं, अशी विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. पण, जागा शिवसेनेची असल्याने मी बोलेन, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. आमची तेव्हाही इच्छा होती, आजही आहे. संभाजीराजे हे महत्वाचं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेला निर्णय घ्यायचा होता, तो त्यांनी आता घेतला आहे.

आर्यन खान प्रकरणी कुणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे

आर्यन खान निर्दोष असल्याच्या एनसीबीच्या पवित्र्यावर थोरात म्हणाले की, अलीकडच्या कालखंडात जे घडतंय ते दुर्दैवी आहे. काही लोकांना ताब्यात घेतलं जातं, तुरुंगवास होतो. जबाबामुळे मानसिक त्रासाला समोर जावं लागतं. आर्यन खानच्या प्रकरणात तो कालखंड त्या तरुण मुलासाठी किती वाईट असेल. त्या त्रासच काय? एका तरुण मुलाला विनाकारण त्रास होतो, त्याचं काय? चुकीच्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या जातात, त्यासाठी कुणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT