ashok chavan, basavrajpatil  Sarkarnama
विश्लेषण

Basavraj Patil News : काँग्रेसचा बाल्लेकिल्लाच ढासळला; महिन्याभरातच मराठवाड्यात पक्षाला दोन मोठे धक्के

Sachin Waghmare

Political News : गेल्या दोन वर्षातील फोडाफोडीमुळे राज्यातील राजकारणाचा कूस बदलला आहे. या महिन्यातच मराठवाड्यातील काँग्रेसच्या दोन दिग्ग्ज नेत्यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपची वाट धरली आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या तीन महिन्यापासून जाणार-जाणार अशी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या नावाची मोठी चर्चा होती. पक्षाच्या कार्यक्रमाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत होते. दुसरीकडे अशोक चव्हाण यांच्यापूर्वी बसवराज पाटील राजीनामा देतील, अशी चर्चा होती.

दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील ४० आमदार फोडत शिवसेना-भाजपला जवळ केले. त्यानंतर काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सगळ्या फाटाफुटींनंतर आता भाजपपासून दूर गेलेल्या नेतेमंडळींना ऑफर दिली जात असल्याची चर्चा जोरात असतानाच बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

बसवराज पाटील हे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे ते काँग्रेस सोडतील असे कोणालाच वाटत नव्हते. काँग्रेसने त्यांना भरभरून दिले आहे. तीन वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री पद त्यांना दिले होते. सध्या त्यांच्यावर काँग्रेसची संघटनात्मक जबाबदारी मोठी होती.

बसवराज पाटील हे काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष होते. तर त्याचे बंधू बापूराव पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. हे पद त्यांना दुसऱ्यांदा मिळाले आहे. त्यांचे चिरंजीव शरण पाटील हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. तर सध्या निवडणूक लढवून ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसने त्यांना सर्व काही दिले होते.

धाराशिव जिल्ह्यात एकेकाळी दिग्गज नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांच्याशी दोन हात केले होते. त्यामुळे त्याची बक्षिसी मिळून सर्वकाही मिळाले होते. 1999 मध्ये उमरगा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर रवींद्र गायकवाड यांचा पराभव करीत बाजी मारली होती. त्यानंतर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसचे सरकार आले. त्यावेळी ग्रामविकास राज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत उमरगा मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2009 मध्ये उमरगा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे औसा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीपूर्वी काही दिवसांतच त्यांना उमेदवारी मिळाली व औशातून विजयश्री खेचून आणला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकूनही मंत्रिपद दिले नव्हते. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांना हॅट्ट्रिक करता आली नाही. भाजपच्या अभिमन्यू पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली होती. त्याशिवाय चिरंजीव शरण पाटील यांच्याकडे युवक काँग्रेसचे मोठे पद दिले होते. मुरूम येथील साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगला जमही बसवला होता. येत्या काळात पुन्हा औसा मतदारसंघातून संधी मिळाली असती, मात्र, तत्पूर्वीच काँग्रेस (Congress) सोडून भाजपला (Bjp) जवळ करण्याचा घेतलेला निर्णय अनेकांच्या पचनी पडत नाही. विशेषतः राजकारणात आपली ओळख शिवराज पाटील-चाकूरकर (Shivraj patil) यांचे मानसपुत्र अशीच होती. मात्र, त्यांच्या भावनेचा विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे अनेकजण अचंबित झाले आहेत.

SCROLL FOR NEXT