Strategy Shift for the Next Vice President Nominee : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सत्ताधारी भाजप, एनडीए आणि मोदी सरकारसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. उपराष्ट्रपतींनी अशाप्रकारे राजीनामा देण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे भाजपला या घटनेतून मोठा राजकीय धडा मिळाला आहे. धनखड यांच्याबाबतची भाजपला ती चूक चांगलीच महागात पडल्याची चर्चा आहे.
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर भाजपकडूनही उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. विरोधकांकडून या निवडणुकीतही उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने धनखड यांच्याविरोधात मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी दिली होती. विरोधकांकडून आवश्यक संख्याबळ नसल्याने उमेदवार दिला तरी लढत एकतर्फी होणार आहे. एनडीएच्या उमेदवाराचा विजय निश्चित असला तरी आता भाजपला उमेदवार देताना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे.
भाजपने धनखड यांच्यावर कमी कालावधीच मोठी जबाबदारी सोपवत चूक केल्याची चर्चा आता राजकीय वर्तूळात होत आहे. त्यामुळे यावेळी असा प्रयोग करायचा नाही, अशीही चर्चा आहे. भाजपकडून संघटनेशी एकनिष्ठ, वर्षानुवर्षे सक्रीयपणे काम करणारा, अनुभवी आणि राजकीयदृष्ट्या विश्वासार्ह चेहरा शोधला जात आहे. हा नेता भाजपमधीलच असेल, याचीच दाट शक्यता आहे. मित्रपक्षातील एखादे नाव पुढे आले तर ते केवळ जातीय किंवा आगामी निवडणुका विचारात घेऊनच निश्चित होईल, असे मानले जात आहे. पण आता पुन्हा भाजप अशी रिस्क घेईल, असे वाटत नाही.
धनखड यांच्याबाबत भाजपचे काय चुकले, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. धनखड हे मुळचे भाजपच्या मुशीत वाढलेले नेते नाहीत. त्यांची राजकीय वाटचाल 1989 मध्ये जनता दलातून सुरू झाली. त्यानंतर ते दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये दाखल झाले. पुढे ते काँग्रेसमध्ये बराच काळ सक्रीय होते. पण पुन्हा त्यांनी पक्षांतर करत 2003 मध्ये भाजपशी जोडले गेले. तेव्हापासून ते भाजपमध्ये असले तरी संघटनात्मक पातळीवर त्यांचा फारसा वरचष्मा राहिला नाही. मात्र, ते पेशाने वकील असल्याने भाजप नेत्यांशी संबंधित काय प्रकरणांमध्ये त्यांच्या वकिलीचा कस लागला. तिथेच त्यांनी पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले आणि 2019 मध्ये थेट पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधात त्यांचा सतत वाद होत राहिला. जवळपास अडीच वर्षे बंगाल सरकारला धारेवर धरणाऱ्या धनखड 2022 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. भाजपने त्यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास दाखवला होता. पण भाजपची ही चूक होती, असे आता त्यांच्या राजीनाम्यानंतर नेत्यांना वाटू लागले आहे. ते मुळेच भाजपचे नसल्याने त्यांच्याबाबत भाजपची भूमिका चुकल्याचे वाटू लागले आहे.
धनखड हे उपराष्ट्रपती झाल्यापासूनच प्रामुख्याने शेतीच्या मुद्द्यावर सरकारचे कान उपटताना दिसत होते. राज्यसभेतील विरोधकांविषयीच्या त्यांच्या भूमिकेवरून सातत्याने वाद निर्माण होत होते. प्रोटोकॉलच्या मुद्यावरही ते उघडपणे नाराजी व्यक्त करायचे. न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या महाभियोगाच्या प्रस्तावाबाबत तर त्यांनी सरकारलाही अंधारात ठेवत विरोधकांचा प्रस्ताव स्वीकारला. त्यामुळे सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. याच नाराजीनाट्यातून धनखड यांना राजीनामा द्यावा लागल्याची चर्चा आहे.
धनखड यांच्यावर भाजपने डोळे झाकून विश्वास ठेवला होता. पण धनखड यांनी कथित दबाव झुगारला आणि भाजपला नामुष्की ओढावली, असे म्हणावे लागले. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिध्द सभापती असतात. राज्यसभा संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याचे काम उपराष्ट्रपती म्हणजेच सभापतींना पार पाडावे लागते. तसेच सरकारसाठीही हे पद अत्यंत महत्वाचे असते. त्यामुळेच आता नवीन उपराष्ट्रपतींची निवड करताना जुन्या चुकांमधून शिकत भाजपला ‘अस्सल’ नेता शोधावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.