ashok chavan
ashok chavan sarkarnama
विश्लेषण

Ashok Chavan : अशोक चव्हाणांना टार्गेट न करण्याची भाजप नेत्यांची भूमिका?

Jagdish Pansare

Nanded News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी काल (ता.२२) रोजी भाजपचे निरीक्षक म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे नांदेडमध्ये येऊन गेले.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्याचे खापर माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांच्या माथी मारले जात आहे. परंतु, आगामी विधानसभा निवडणुका पाहता लोकसभेतील पराभवावरून अशोक चव्हाण यांना टार्गेट केले जाऊ नये, यासाठी भाजपमधील नेते सरसावले आहेत.

राज्यात व मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या घटली. 'मिशन 45' तर फेल गेले. पण, मराठवाड्यात भाजपचा एकही खासदार निवडून आला नाही. या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपने निरीक्षकांना पाठवून आढावा घेतला. रावसाहेब दानवे हे स्वतः लोकसभेच्या जालना मतदारसंघातून एक लाखांच्या फरकाने पराभूत झाले. बीड, लातूर, नांदेडमध्ये भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले.

प्रत्येक जिल्ह्याचा व एकूणच राज्याचा विचार केला, तर मराठा आरक्षण व त्यावरुन सुरु असलेले आंदोलन या मोठा फटका महायुतीला बसल्याचे समोर आले आहे. या शिवाय 'अब की बार चार सौ पार'चा नारा भाजपने संविधान बदलण्यासाठी दिला असल्याचा विरोधकांनी केलेला प्रचार परिणामकारक ठरला. ही प्रमुख दोन कारणे प्रामुख्याने भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे मराठवाड्यातील सातही मतदारसंघात आढावा घेण्यासाठी आलेल्या भाजप निरीक्षकांच्या बैठकांमधून समोर आले आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघातील पराभवाची सर्वाधिक चर्चा होण्याचे कारण म्हणजे निवडणुकीच्या दोन महिन्यांआधीच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाने प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र, इतर मतदारसंघाप्रमाणे इथेही पराभवच झाला.

यावरून अशोक चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. भाजपमध्येही त्यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जाते. परंतु, अशोक चव्हाण यांना लोकसभेतील पराभवावरून लक्ष्य करायचे नाही, अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे बोलले जाते. रावसाहेब दानवे यांनी आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण यांची पाठराखण केल्याचे दिसून आले.

नांदेड लोकसभा निवडणुकीतील पराभवाला अशोक चव्हाण यांना जबाबदार धरता येणार नाही. ते भाजपमध्ये आले नसते तरी आमचा पराभव झाला असता. ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती, जनतेने आमचा पराभव केला, त्याला अशोक चव्हाण जबाबदार कसे? असे म्हणत दानवेंनी बाजू सावरली. अशोक चव्हाण अद्याप नांदेड लोकसभेतील पराभवावर जाहीरपणे बोललेले नाहीत.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्या संदर्भात केलेल्या विधानवरून घुमजाव केले होते. माझ्या पराभवामुळे अशोक चव्हाण यांचे मंत्रीपद हुकले, असे चिखलीकर म्हणाले होते. पण, वरिष्ठांकडून समज दिल्यानंतर चिखलीकरांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे म्हणत माघार घेतली.

त्याआधी नुकत्याच भाजपला 'रामराम' करत सोडचिठ्ठी दिलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीला अशोक चव्हाण यांना जबाबदार धरता येणार नाही, असे म्हटले होते. सुर्यकांता पाटील, प्रताप पाटील चिखलीकर आणि आता रावसाहेब दानवे यांनीही अशोक चव्हाण यांची पाठराखण केल्याने पक्षाने चव्हाण यांना दुखवायचे नाही, अशी भूमिका घेतल्याचे दिसते.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या चाळीस वर्षापासून राजकारणात असलेल्या चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यावर वर्चस्व आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलतात याची जाणीव पक्ष नेतृत्वाला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांना लोकसभेच्या पराभवावरून न दुखावण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT