Ajay Mishra and Narendra Modi
Ajay Mishra and Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

कृषी कायद्यानंतर आता पडणार भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची विकेट?

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथील घटनेची विरोधक आठवण करून देऊ लागले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. एवढे दिवस भाजपचे नेतृत्व मिश्रा यांचा राजीनामा घेण्यास तयार नव्हते. परंतु, आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिश्रा यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर सर्व विरोधक लखीमपूर खीरीतील हिंसाचाराची आठवण करून देऊ लागले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिषला अटक झाली आहे. सुरवातीला आपला मुलगा निष्पाप असल्याचा दावा अजय मिश्रांनी केला होता. परंतु, घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांचा बचाव गळून पडला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवातीला मिश्रा यांच्या पाठीशी असलेले भाजप नेतृत्वा आता त्यांच्यापासून अंतर राखू लागले आहे. आता अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. कृषी कायदे आणि नंतर लखीमपूर खीरी प्रकरणामुळे भाजप बॅकफूटवर गेला होता. पुढील वर्षाच्या सुरवातीला उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या घटनेचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून डॅमेज कंट्रोल मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत मिश्रा यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

आशिष मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT