ajit pawar | eknath shinde | devendra fadnavis  sarkarnama
विश्लेषण

Bjp News : बीडमधील आणखी एका आमदाराची निवडणुकीला 'ना'! महायुतीला चिंतन करायला लावणारी बाब

Datta Deshmukh

पावणे पाच वर्षे प्रयत्न केल्यावर आता लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीच्या आमदारांनी निवडणुकीला 'ना' म्हणायला सुरुवात केली आहे. माजलगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर आता गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी देखील आपण किंवा कुटुंबातील कोणीच निवडणूक लढविणार नाही, असे सांगितले आहे.

खुद्द पवारांच्या हवाल्याने शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर त्यांनी वृत्त फेटाळले नाही. उलट ते संपर्काबाहेरच आहेत. मात्र, राजकीय जाणकार आमदार पवार ( Laxman Pawar ) यांच्या भूमिकेचे वेगवेगळ्या अँगलने विश्लेषण करत आहेत. लोकसभा निवडणुकीतील त्यांची 'सायलेंट' भूमिका मतदारसंघातील कट्टर मुंडे समर्थकांना खटकलेली आहे.

दुसरी बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत विरोधीपक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळाले, त्यामुळे विधानसभेला हा गॅप कसा भरून निघणार ही देखील चिंता आहेच. तसेच, अमरसिंह पंडित याचे धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटू शकते. या सगळ्या बाबींमुळे 'सेट बॅक' बसल्याने आमदार पवारांनी 'आता निवडणूक नको' असा पवित्रा घेतला असू शकतो. कार्यकर्त्यांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी असे अस्त्र हमखास वापरले जाते, असे राजकीय विश्लेषक सुमंत भोसले यांचे मत आहे.

त्यात जरी आमदार पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिलेच तरी त्यांच्या भावजय गीताभाभी बाळराजे पवार किंवा पुतण्या शिवराज रिंगणात उतरायचे कसे थांबतील. आजारासह इतर कारणांनी आमदार पवार शांत असल्यापासून गीताभाभी व शिवराज पवार बहुतांशी राजकीय निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांच्यापैकी एकजण निवडणूक रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ शकतो, असेही भोसले सांगतात.

मात्र, केंद्र व राज्यात सत्ता आणि सर्वात मोठा भाजप ( Bjp ) पक्षाच्या आमदारांना, अशी भूमिका घ्यावी लागणे देखील पक्षाला चिंतन करायला लावणारे आहे. आमदार लक्ष्मण पवार म्हणाले, "सध्याच्या राजकारणाला मी कंटाळलो आहे. मी जर जनतेची कामे करू शकत नसेल तर माझ्या पदाचा उपयोग काय ? माझे गाऱ्हाणे मी पक्षश्रेष्ठींपुढे मांडले. एक गोष्ट मी एकदाच सांगतो, वारंवार तक्रारी करण्याचा माझा स्वभाव नाही, पण तरीही सुधारणा होत नसतील तर आम्ही स्वाभिमानी आहोत,' असे म्हटले आहे.

सत्ताधारी आमदारच असे हतबल असतील तर कार्यकर्ते व मतदार किती या कारभारावर किती खुश असतील याचा सहज अंदाज येईल. "एक चांगला तहसिलदार, चांगला पोलीस अधिकारी, चांगला बीडीओ एवढंच मागितलं होतं, परंतु ते ही मिळालं नाही. पालकमंत्री ऐकत नाहीत त्यामुळे राजकारण करायचं तरी कशाला? चांगल्या कामाला सहकार्य करू, चळवळीत राहू, मी पक्ष सोडणार नाही, अशीही भूमिका आमदार पवार यांनी मांडली.

"जिल्ह्यात पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. यावरून राज्यात राष्ट्रवादीला घेण्याने जे झाले ते बीडमध्ये यावर मोहर उमटली. नाराजी ज्यांच्या समोर बोलायचे त्या पक्षाच्या श्रेष्ठींसमोर मी हा विषय बोललो, परंतु त्याची गांभीर्यानं दखल घेतली नाही. 2014 ते 2019 हा माझ्या आमदारकीचा कार्यकाळ मला समाधान देणारा राहिला. या काळात कामही झाली, वरच्या नेतृत्वानेही सांगितलं तसं केलं. परंतु, 2019 नंतर आम्ही काही काळ विरोधीपक्षात होतो, तेंव्हा विरोधी पक्षात राहूनही आपण चांगले काम करु शकतो. सर्वांनी एकत्र येऊन काही गोष्टी केल्या पाहिजेत असा विषयही मी पक्षश्रेष्ठींसमोर वारंवार मांडत आलो, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही," अशी खंत आमदार पवार यांनी व्यक्त केली.

"दोन-अडीच वर्षापूर्वी आम्ही सत्तेत गेलो, तीन पक्षाचं सरकार आले. खूप काही अपेक्षा होत्या, मात्र त्या पूर्ण झालेल्या नाहीत. गेवराई मतदारसंघाचा मी आमदार असताना माझ्या मताला काही किंमत आहे की नाही? मी ज्या भूमिका घेत आहे, ज्या जनतेचं प्रतिनिधित्व करत आहे त्या जनतेच्या व्यथा मांडण्याची माझी जबाबदारी आहे की नाही? हा प्रश्न मला पडतो," असे मत आमदार पवार यांचे गेवराईबाबत असले, तरी एकूणच भाजपच्या आताच्या परिस्थितीचे चित्र दाखवितात.

आमदार पवार यांच्या पालकमंत्री यांच्या आक्षेपाबद्दल राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी त्यांच्यावर तोफ डागत, "स्वतःच्या कर्तृत्वशून्यतेचा ठपका दुसऱ्यावर ठेवू नये," असा टोला लगावला आहे.

दरम्यान, लक्ष्मण पवार 2014 पासून गेवराई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. वकील असलेले पवार नगराध्यक्ष म्हणून राजकारणात उतरले. त्यांचे वडील देखील आमदार होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT