Varun Gandhi
Varun Gandhi Sarkarnama
विश्लेषण

वरुण गांधींनी पंतप्रधान मोदींसह भाजप सरकारलाच पाडलं तोंडावर!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कृषी कायद्यांवर यू-टर्न घेतला आहे. मागील वर्षभरापासून तीन कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुळे मोदींनी हे कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. मात्र आता भाजपचे (BJP) खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) यांनी नरेंद्र मोदींसह भाजप सरकारला अडचणीत आणले आहे. हमी भाव कायदा तातडीने सरकारने करावा म्हणजे आंदोलन करणारे शेतकरी घरी जातील, अशी मागणी करून त्यांनी सरकारची कोंडी केली आहे.

कृषी कायदे आणि त्यामुळे शेतकरी आंदोलन भाजपला चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे. भाजपने या प्रकरणी वर्षभरानंतर सपशेल शरणागती पत्करत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. तरीही शेतकरी माघार घेण्यास तयार नाहीत. हे तिन्ही कायदे संसदेत माघारी घेतल्यानंर घरी जाण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. यातच शेतकऱ्यांनी हमीभाव कायद्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे सरकारची कोंडी झाली आहे.

आता भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीच केंद्र सरकारला अडचणीत आणले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हमी भाव कायदा तातडीने करण्याची मागणी केली आहे. हा कायदा केल्यानंतर शेतकरी तातडीने त्यांच्या घरी जाऊ शकतील, असे गांधींनी म्हटले आहे. शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांनी हात होरपळल्यानंतर सरकार अलगदपणे यातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करीत असताना वरुण गांधींनी ही मागणी करून सरकारलाच तोंडावर पाडले आहे.

देशवासियांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी 19 नोव्हेंबरला कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. या वेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. या महाअभियानात देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले होते. याचा उद्देश देशातील शेतकऱ्यांना अधिक ताकद मिळावी, उत्पादनाची योग्य किंमत आणि विक्रीचे पर्याय मिळावेत, असे होते. यावर संसदेत चर्चा झाली, नंतर हे कायदे आणले. देशातील कानाकोपऱ्यातील कोट्यवधी शेतकरी, अनेक शेतकरी संघटनांचे याचे स्वागत केले. मी आज त्या सर्वांचे आभार मानतो.

मी आज देशवासियांची क्षमा मागत सत्य आणि पवित्र मनाने सांगू इच्छितो की, बहुतेक आमच्या तपस्येतच काही कमी राहिली असेल. दिव्याच्या प्रकाशाएवढे सत्य काही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही. आज गुरूनाक देवजींचे पवित्र प्रकाशपर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष देण्याची नाही. मी पूर्ण देशाला सांगायला आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस ससंदेत तिन्ही कृषी कायद्यांना परत घेण्याची संवैधानिक प्रक्रिया पूर्ण केले जाईल. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपआपल्या घरी जावे, शेतात जावे, कुटुंबात जावे. या नवीन सुरूवात करूया. नव्याने पुढे जाऊ, असे आवाहनही मोदींनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT