Ajay Mishra and Amit Shah
Ajay Mishra and Amit Shah 
विश्लेषण

मोदी सरकारची कोंडी; केंद्रीय मंत्र्यांवर कारवाईची भाजप खासदारांचीच मागणी

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथील घटनेची विरोधक आठवण करून देऊ लागले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते. आता भाजपचे खासदार वरूण गांधी (Varun Gandhi) यांनीच मंत्री मिश्रांच्या राजीनाम्याची मागणी थेट मोदींकडे केल्याने राजकीय भूकंप झाला आहे.

वरुण गांधींनी आज मोदींना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात कृषी कायदे मागे घेण्यसा झालेल्या विलंबावर बोट ठेवले आहे. आधीच हे कायदे मागे घेतले असते तर 700 निष्पाप शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते, असे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या आशिष मिश्राचे पिता अजय मिश्रा यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात असताना वरुण गांधींनीच आता ही मागणी केल्याने भाजप सरकारची कोंडी झाली आहे.

लखीमपूर खीरीतील घटनाही आपल्या लोकशाहीवरील कलंक आहे. यामुळे तिची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही वरूण गांधींनी केली आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. याचबरोबर शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर सर्व विरोधक लखीमपूर खीरीतील हिंसाचाराची आठवण करून देऊ लागले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिषला अटक झाली आहे. सुरवातीला आपला मुलगा निष्पाप असल्याचा दावा अजय मिश्रांनी केला होता. परंतु, घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांचा बचाव गळून पडला होता.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

आशिष मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT