centre invites farm oragainstion to talks today on issue of farm laws
centre invites farm oragainstion to talks today on issue of farm laws 
विश्लेषण

शेतकरी आंदोलनाचा पहिला विजय...मोदी सरकार तीन दिवस आधीच झुकले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनाकडे सुरवातीला फारसे गंभीरपणे न पाहणारे केंद्रातील मोदी सरकार आता खडबडून जागे झाले आहे. शेतकऱ्यांनी ३ डिसेंबरला चर्चेसाठी बोलावणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांनी तीन दिवस आधीच म्हणजे आजच चर्चेचे आमंत्रण दिले आहे. महत्वाचे सरकारने यासाठी शेतकरी नेत्यांना कोणतीही अट घातलेली नाही. 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास यावे, असे आवाहन आधी केले होते. शेतकरी बुराडी मैदानावर आंदोलन करण्यास आल्यानंतर केंद्र सरकार चर्चा करेल, अशी अटही घातली होती. त्यामुळे हे आवाहन शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावले होते. शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यात काल (ता.३० नोव्हेंबर) २४ तासांत दुसरी बैठक झाली होती. या चर्चेनंतर अमित शहांनी शेतकरी नेत्यांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला. मात्र, विनाशर्त चर्चेस यावे, असे शहांनी सांगितले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांना चर्चेचे आवाहन केले होते. शेतकरी संघटनांनी सरकारचा सशर्त चर्चेचा प्रस्ताव फेटाळला होता. यामुळे आमच्या मार्गानेच चर्चा होईल, असा इशारा शेतकऱ्यांनी सरकारला दिला होता. याचवेळी दिल्लीत प्रवेश करणाऱ्या महामार्गांवरील आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. 

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी आज पुन्हा एकदा चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यांनी नियोजित बैठकीच्या तीन दिवस आधी चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. ते म्हणाले की, आधी ३ डिसेंबरला चर्चा होणार होती. परंतु, थंडी आणि कोरोनाच्या संसर्गामुळे आम्ही आजच बैठक बोलावली आहे. शेतकरी नेत्यांना आज दुपारी  ३ वाजता विज्ञान भवनात चर्चेसाठी बोलावले आहे. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करीत आहोत. 

सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलनाचा शेतकऱ्यांच्या आज सलग सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने चर्चेसाठी कोणतीही अट घालू नये, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे. राष्ट्रीय किसान महासंघ आणि भारतीय किसान युनियनच्या अनेक गटांनी दिल्ली चलो या आंदोलनाची हाक दिली आहे. 

दिल्लीत आंदोलनासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर अडवून त्यांच्यावर बळाचा वापर करणारे हरियाना आणि दिल्लीतील पोलीस टीकेची धनी बनले आहेत. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यासोबत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून खुनाच्या प्रयत्नासह दंगल आणि कोरोनाविषयक नियमांच्या भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. 

पोलिसांना शेतकऱ्यांना रोखण्यासाठी महामार्गांवर काटेरी तार कुंपणासोबत सिमेंटचे मोठे ब्लॉक्स अडथळे म्हणून लावले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्तेही जेसीबीने उखडण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांनी अखेर दिल्लीतील बुराडी मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. बुराडी मैदानावर सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास नकार दिला होता. काही शेतकरी संघटना बुराडी मैदानावर असून, मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर थाबंले आहेत. सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी थांबले आहेत. या शेतकऱ्यांनी दिल्लीचे पाचही प्रवेश मार्ग अडवून आता दिल्लीला वेढा घातला आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT