विश्लेषण

महिलेचा अवमान करण्यापेक्षा अर्थमंत्री बदला : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो

सातारा : अर्थसंकल्पाच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे स्वत:च घेत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बैठकांना बोलावतही नाहीत. त्यांच्यावर विश्‍वास नसेल तर महिलेचा अवमान करण्यापेक्षा अर्थमंत्री बदलावा. कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली ते मोदी सांगू शकत नाहीत. स्वत:ला सगळे काही कळते असे समजून त्यांनी अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे, अशी घणाघाती टिका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

सातारा येथील कॉंग्रेस भवनात त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, ""केंद्रीय अर्थसंकल्प घोषित करण्यासाठी वेळापत्रक निश्‍चित केले जाते. अर्थमंत्री हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची बैठक घेतात. यावेळी पहिल्यांदाच या परंपरा खंडीत झाल्या आहेत. अर्थसंकल्पासाठी झालेल्या 13 बैठका नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीच घेतल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बैठकांना बोलाविले नव्हते. त्यांची कामगिरी सुमार आहे, त्यांच्यावर विश्‍वास नसेल तर महिलेचा अवमान करण्यापेक्षा अर्थमंत्री बदलावा.'' 

भारताचे सध्याचे दरडोई उत्पन्न दोन हजार डॉलर आहे. ते दुप्पटीने वाढविले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्थेचा विकास ढासळला. माजी आर्थिक सल्लागार सुब्रह्मण्यम यांनी मोदी सरकार विकासदाराचे आकडे 2.5 टक्‍क्‍यांनी फुगवून सांगत आहे, असा आरोप केला आहे. त्यावरून हा विकासदर केवळ दोनच टक्‍के आहे, असे समोर येत आहे. आमच्या सरकारच्या काळात 2010-11 मध्ये हा विकासदर 10.8 टक्‍के होता. कोणत्या विद्यापीठातून डिग्री घेतली ते मोदी सांगू शकत नाहीत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची. नोटाबंदीने अर्थव्यवस्थेवर तर आता "सीएए', "एनआरसी'ने संविधानावर हल्ला केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

श्री. चव्हाण म्हणाले, ""सीएए, एनआरसी या कायद्यांत मुलभूत बदल करून देशाच्या संविधानावर हल्ला केला आहे. शहा, मोदींमध्ये विसंगती आहे. मोदींना शहांनी खोटे पाडले आहे. लोकशाहीच्या निर्देशकांमध्ये भारत 41 स्थानावर होता. आता तो 51 स्थानावर घसरला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संविधान असुरक्षित असल्याची भावना आहे. हा कायदा सरकारने रद्द करावा.'' श्री. चव्हाण म्हणाले, ""देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा वापर केला. त्यांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी वाढली. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक वाढली नाही. मोठे पायाभूत प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. नवीन एकही सार्वजनिक उद्योग राज्यात आला नाही. मेक इन इंडियाच्या केवळ जाहिराती करत राहिले. गेल्या 45 वर्षात सर्वात जादा बेरोजगारी मोदी सरकारच्या काळात आली. महाराष्ट्रात तर कोणताच उद्योग आला नाही. फडणवीसांनी विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्टाचारी सरकार फडणवीसांचे होते. ते थांबविण्यासाठीच तीन पक्ष एकत्र आलो.'' 

सेनेबरोबर जाण्याची परिस्थिती नव्हती 
2014 च्या निवडणुकीनंतर भाजप अल्पमतात होते. त्यावेळी शिवसेनेबरोबर सरकार का झाले नाही, हा प्रश्‍न वेगळा आहे. त्यावेळी शिवसेनेबरोबर जाण्याची परिस्थिती नव्हती. त्यावेळी निर्णय घ्यायला हवा होता, हे आता वाटते, असे एका प्रश्‍नावर सांगून राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. चव्हाण यांन स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माझे चांगले जुळते, असेही त्यांनी सांगितले. 


पृथ्वीबाबांचे टीकास्त्र... 
फडणवीसांनी केवळ इव्हेंट मॅनेजमेंट केले 
त्यांनी एकही पायाभूत प्रकल्प पूर्णत्वाला नेला नाही 
महाराष्ट्राचे अतोनात नुकसान देवेंद्र सरकारने केले 
बॅंकींग क्षेत्रात 71 हजार कोटींचे घोटाळे झाले 
90 टक्‍के घोटाळे राष्ट्रीयीकृत बॅंकांत झाले 
पत्रकारांना "डीपीसी'ला केलेला हे मज्जाव अयोग्यच 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT