Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Ahmednagar Politics: निळवंडे धरणाच्या कालव्यांचा प्रश्न सोडून शिंदे-फडणवीसांनी साधलं अर्ध्या नगरचं राजकारण?

Ganesh Thombare

Ahmednagar News: निळवंडे प्रकल्पाचे काम तब्बल ५३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पूर्ण झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ३१ मे कालव्यात पाणी सोडून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या निळवंडे धरणाच्या प्रकल्पामुळे नगर जिल्ह्यातील पाच आणि नाशिकमधील सिन्नर असे मिळून सहा तालुक्यांचा पाणी प्रश्न मिटणार आहे.

१९७० मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र, श्रेयवादाच्या लढाईत या प्रकल्पाला पूर्ण होण्यास तब्बल ५३ वर्ष लागले. नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांचे राजकारण आणि अपुरी आर्थिक तरतूदीचा फटका या प्रकल्पाच्या कामाला बसला.

आज कालव्यात पाणी सोडून या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. मात्र, प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत अजून काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. याबरोबरच या प्रकल्पाच्या माध्यमातून आता आगामी काळात नगर जिल्ह्यातील राजकीय गणितंही बदलण्याची शक्यता आहे.

निळवंडे धरणाचा इतिहास

१९७० मध्ये प्रवरा नदीवरील म्हाळादेवी या ठिकाणी धरण बांधण्यास मान्यता मिळाली. त्यानंतर धरणाचे भूमिपूजन करण्यात आले. पण स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या धरणाची जागा बदलावी लागली . त्यानंतर निळवंडे येथे हा प्रकल्प निश्चित करण्यात आला. १९९६ च्या दरम्यान या प्रकल्पाच्या बांधकामास सुरवात झाली.

२०१२ ते २०१३ च्या दरम्यान हे बांधकाम पूर्ण झाले. मात्र, त्यानंतर कालव्यांचे काम अपूर्ण राहिले. आता आज कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी घेण्यात आली. दरम्यानच्या काळात निळवंडे प्रकल्पाला विलंब झाल्यामुळे ७.९ कोटीवरून थेट ५१७७ कोटी रुपयांवर खर्च पोहोचला. हा संपूर्ण प्रकल्प धरण आणि कालव्याच्या जाळ्यासह मिळून जवळपास १८२ किमी पेक्षा जास्त भागात पसरलेला आहे. याचा फायदा नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्यातील अनेक गावांना होणार आहे.

निळवंडे धरण प्रकल्पाला विखे-थोरात संघर्षाची झळ?

निळवंडे धरण प्रकल्प हा अकोले तालुक्यात आहे. निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात नगर जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेते आहेत. यामध्ये भाजप नेते मधुकर पिचड, भाजप नेते राधाकृष्ण विखे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अजून काही नेते या क्षेत्रात आहेत. त्यामुळे श्रेयवादाचं राजकारण आणि राजकीय हितसंबंध या सर्वांच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणाची झळ या प्रकल्पाला बसल्याचं बोललं जातं. याबरोबर विखे-थोरात यांच्या राजकीय संघर्षाची झळही या प्रकल्पाला बसल्याचं बोललं जातं.

निळवंडे धरणाच्या कालव्यातून आगामी राजकारण बदलणार?

नगर जिल्ह्यातील उत्तरेच्या भागात निळवंडे धरणाच्या प्रश्नावरच गेली अनेक वर्ष राजकारण सुरू आहे. त्याबरोबरच गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कालव्यात पाणी सोडून पहिली चाचणी घेण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात झाले. आगामी लोकसभा आणि विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे निळवंडे धरणाच्या कालव्याचा प्रश्न सोडवून शिंदे-फडणवीसांनी अर्ध्या नगरचं राजकारण साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या कालव्याचा प्रश्न सोडवल्याने याचा फायदा तब्बल सहा तालुक्याला होणार आहे. हा प्रश्न सोडवल्याचा मुद्धा आगामी निवडणुकीत महत्वाचा ठरणार ठरण्याची शक्यता असून पाणी सोडल्यामुळे राजकीय परिस्थितीही बदणार का? असा प्रश्नही आता उपस्थित करण्यात येत आहे.

गेले अनेक वर्ष अडकलेल्या कालव्याच्या प्रश्न मार्गी लावत शिंदे-फडणवीसांनी राजकीय टायमिंग साधत अर्ध्या नगरचं राजकारण साधलं असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपसह शिवसेनेला (शिंदे गट) याचा फायदा होणार असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT