Chitra Wagh & Dr. Heena Gavit.
Chitra Wagh & Dr. Heena Gavit. 
विश्लेषण

चित्रा वाघ, हीना गावितांवर भाजपमध्ये मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP) गुरूवारी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. या कार्यकारिणीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रकाश जावडेकर, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, खासदार डॉ. हीना गावित, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर आदी नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. वाघ व गावितांवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे.

पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिव पदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांच्यावर भाजपनं काही महिन्यांतच पक्षात मोठं स्थान दिलं आहे. सध्या त्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. मागील काही दिवसांपासून त्या सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांना त्यांनी धारेवर धरले आहे. त्यामुळं त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आल्याचे समजते.

हीना गावित यांच्यावर राष्ट्रीय प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना पहिल्यांदाच पक्षात राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्यांमध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुध्दे यांचा समावेश आहे. विनोद तावडे, विजया रहाटकर, पंकजा मुंडे आणि सुनिल देवधर यांचाही कार्यकारिणीमध्ये समावेश आहे. त्यांच्यावरील राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रातून आमदार सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार आणि लड्डाराम नागवाणी यांना स्थान देण्यात आलं आहे.

वरूण गांधी, विनय कटियार यांना वगळलं

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेचे व्हिडीओ ट्विटवर शेअर करत भाजपचे खासदार वरूण गांधींनी कारवाईची मागणी केली आहे. या घटनेत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. वरूण गांधी ट्विटनंतर काही तासांतच त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आलं आहे. त्यांच्यासह विनट कटियार यांनाही वगळण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत घेण्यात आलं आहे. वरूण यांच्याप्रमाणेच शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदर सिंग यांनाही वगळलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT