Congress
Congress  Sarkaranama
विश्लेषण

काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे : मुंबई, विदर्भातील दोन मंत्र्यांना मिळणार डच्चू?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. मात्र, काहींनी आपले मंत्रीपद वाचविण्यासाठी, तर काहींनी मंत्रीपदासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू केले आहे. मुंबईतील एक आणि विदर्भातील एक अशा दोन कॅबिनेट मंत्र्याला बदलून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळात बदल झाल्यास काँग्रेस पक्ष संघटनेतील एका वरिष्ठ नेत्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. (Congress high command will take resign in Mumbai and Vidarbha's one minister each)

दरम्यान, विधानसभा निवडणुका पाहून पक्षश्रेष्ठींनी पंजाब, राजस्थानच्या मंत्रिमंडळात बदल केलेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रीमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आपले पद जाण्याच्या भीतीतून काही मंत्री दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांत राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने मागील निवडणुकांच्या तुलनेत चांगले यश मिळविले आहे. तसेच येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आदींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनेची ताकद वाढविण्याकडे लक्ष दिले आहे. पण संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी राज्यातील सत्तेचा फारसा उपयोग होत नसल्याची कार्यकर्त्यांकडून तक्रार केली जात आहे. शिवाय पक्षाचे काही मंत्रीही संघटनेकडे फारसे सक्रीयपणे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत काँग्रेस पक्ष सहभागी असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र सत्ता असल्याचा उत्साह दिसत नाही. दुसरीकडे मात्र राज्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आपली संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी विविध पातळीवर पावले उचलत आहेत.

दरम्यान, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी राज्यात काँग्रेसला पुन्हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखून कामाला सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री बदलण्याच्या हालचाली काँग्रेस हायकमांडने सुरू केल्या आहेत. त्यासाठी श्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पटोले आणि काही मंत्र्यांना दिल्लीत बोलावून घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून आपल्याला डच्चू मिळणार की काय या भीतीने काँग्रेसचे काही मंत्री अक्षरशः धास्तावले आहेत. मंत्रीपद जाण्याच्या भीतीने काहींनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. काही आमदारांनी मात्र मंत्रीमंडळात आपलीच वर्णी लागावी, यासाठी दिल्लीत 'फिल्डिंग' लावली आहे.

दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) पुणे जिल्ह्यातील पक्षाचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात होते. त्या कार्यक्रमात त्यांनी आमदार संग्राम थोपटे व त्यांच्या समर्थकांना तुमच्या मनात जे आहे, त्याबाबत प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे सांगून मंत्रीपदाबाबतचे स्पष्ट संकेत दिले होते. विधानसभा अध्यक्षपद किंवा कॅबिनेट पदासाठी संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी थोपटें यांना 'गुड न्यूज'चे संकेत दिल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात बदल होणार, हे निश्चित समजले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT