नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँगेसमधील (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांनी आघाडी उघडली आहे. आता सिद्धू हे दिल्लीत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या तातडीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
सिद्धू हे दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. मागील अनेक दिवसांपासून सिद्धू हे पक्षनेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचवेळी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही पक्ष नेतृत्वाने भेट दिलेली नाही. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी या तातडीने राहुल गांधींच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. सिद्धू यांना भेट न दिल्यास अंतर्गत कलह आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रियांका या राहुल यांच्या भेटीसाठी गेल्या आहेत. दोघांच्या भेटीनंतर सिद्धू यांना भेटीसाठी बोलावले जाऊ शकते. कारण आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु असताना अंतर्गत संघर्ष काँग्रेसला परवडणारा नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडागंजी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे.
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सिद्धू हे आपमध्ये जाणार असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. सिद्धू यांनीही त्यांना प्रत्युत्तर देत हे सिद्ध करण्याचे खुले आवाहन दिले होते. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपध्दतीवर इतर नेते व मंत्रीही नाराज आहेत. सिद्धू यांच्यासह नाराज मंत्री, आमदारांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी त्यांना नुकतेच दिल्लीत बोलावण्यात आले होते.
तसेच, काँग्रेस नेतृत्वाकडून हरीश रावत यांच्यासह तीन जणांची समितीही तयार करण्यात आली आहे. या समितीने सिध्दू, काँग्रेस नेते परगतसिंग आणि इतर नेत्यांना भेटती होती. तसेच, मुख्यमंत्रीही या समितीसमोर म्हणणे मांडले होते. निवडणूकीआधी काँग्रेसमधील कलह कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या समितीसमोर मागील आठवड्यात दुसऱ्यांदा अमरिंदरसिंग हजर झाले होते. तसेच, सिद्धूही दोनदा या समितीला भेटले आहेत. अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न ही समिती करीत आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.