congress leader s r patil says karnataka government will fall down soon
congress leader s r patil says karnataka government will fall down soon 
विश्लेषण

येडियुरप्पांविना भाजप शून्य...बोम्मई सरकारचे काऊंटडाऊन सुरू!

वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) आले आहेत. महिनाभरातच बोम्मई यांच्यासमोरील अडचणीत वाढ होत असून, आता त्यांच्या विरोधात पक्षातील अनेक नेते भूमिका घेत आहेत. यामुळे बोम्मई  सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, येडियुरप्पांविना भाजप शून्य आहे, असा दावा विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे.  

याबाबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते एस.आर.पाटील यांनी म्हटले आहे की, बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. येडियुरप्पांविना भाजप शून्य आहे. मी सहा महिन्यांपूर्वीच हे भाकित वर्तवले होते. त्यावेळी भाजप नेत्यांनी माझ्यावरच टीका केली होती. आता माझे विधान खरे ठरले आहे. भाजप आता दुभंगलेला पक्ष आहे. बोम्मई सरकारचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येईल. भाजप नेते आता खुर्ची आणि मंत्रिपदासाठी भांडू लागले आहेत. काही जणांनी मलईदार खाती हवी आहेत. त्यामुळे सरकार फार काळ टिकणार नाही. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. आता बोम्मई यांनी माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी.देवैगौडा यांची घेतलेली भेट गाजू लागली आहे. यावर पक्षाचे आमदार प्रितम गौडा यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. 

मंत्रिमंडळ विस्तारात आनंद सिंह यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन विभाग देण्यात आला. यावरुन आनंद सिंह हे नाराज झाले आहेत. सिंह हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देशातील सर्वांत श्रीमंत राजकारण्यांपैकी ते एक आहेत. राज्यातील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडणाऱ्या 17 आमदारांमध्ये त्यांचा समावेश होता. राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर येडियुरप्पांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता.  सिंह यांनी आता राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत येडियुरप्पाही उपस्थित होते. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT